- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर
मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती देण्यासाठी आणि आदिवासी युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” आणि “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने”अंतर्गत आदिवासी पाड्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या मोहिमेचा सविस्तर आढावा सोमवारी मंत्रालयात घेण्यात आला. "मत्स्यव्यवसाय हा आता फक्त शेतीला पूरक व्यवसाय उरलेला नसून ग्रामीण आणि आदिवासी अर्थव्यवस्थेचा कायापालट करणारा मुख्य उद्योग बनत आहे," असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र सरकारने २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 'धरती आभा अभियाना'अंतर्गत देशभरात तब्बल ३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा मोठा हिस्सा महाराष्ट्राला मिळाला असून केंद्र शासन, राज्य शासन आणि लाभार्थी यांच्या त्रिसूत्री सहभागातून आदिवासी भागात आधुनिक मत्स्य प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये पारंपरिक मासेमारीला फाटा देत बायोफ्लॉक, जलाशयातील 'फिश केज, सुसज्ज फिश व्हेंडिंग सेंटर्स आणि साठवणुकीसाठी अत्याधुनिक 'थंड साखळी' सुविधांची निर्मिती केली जात आहे.
५ वर्षांत ३९ कोटींचे १८० प्रकल्प मंजूर :
- बैठकीत सादर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२०-२१ ते २०२४-२५ या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी तब्बल १८० प्रकल्पांना सुमारे ३९.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने १४.९६ कोटी रुपयांचा सुधारित कृती आराखडा सादर केला असून त्यालाही केंद्राची मंजुरी मिळाली आहे. या नव्या आराखड्यात फिश हॅचरी, रिअरिंग पॉण्ड, कोल्ड स्टोरेज, रेफ्रिजरेटेड वाहने, फिश किऑस्क आणि पारंपरिक मच्छीमारांसाठी आधुनिक बोटी व जाळी यांसारख्या १७ महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.