- महायुतीमध्ये रस्सीखेच; शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने दावा प्रबळ
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच महायुतीमध्ये जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 'कोकण स्थानिक स्वराज्य संस्था' मतदारसंघावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू असतानाच, आता शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांनी शड्डू ठोकला आहे. कोकण मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ महायुतीत सर्वाधिक असल्यामुळे या जागेवर त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तटकरे कुटुंब ही जागा राष्ट्रवादीला सुटावी यासाठी आग्रही आहे. सोमवारी रात्रीच सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जागेबाबत चाचपणी केल्याचे समजते. मात्र, शिवसेनेने संख्याबळाच्या आधारे दावा सांगितल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.
कोकण मतदारसंघातील पक्षनिहाय संख्याबळ (एकूण मतदार : ८३१)
राजकीय पक्ष | जिल्हा परिषद मतदार | नगरपरिषद मतदार | एकूण संख्याबळ
शिवसेना - ७७ | १५९ | २३६
भाजप - ४६ | १०५ | १५१
राष्ट्रवादी काँग्रेस - १८ | ४५ | ६३