फलटण : महाराष्ट्रातील फलटण येथील ‘यशवंत सहकारी बँक’चा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे, आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत होणे आणि भविष्यात उत्पन्न वाढण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे RBI ने ही मोठी कारवाई केली. १९ मे १०१६ रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्यात येणार आहेत.
RBI ने महाराष्ट्र सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंतीही केली आहे. बँकेने बँकिंग नियमन कायद्यातील अनेक आवश्यक नियमांचे पालन केले नसल्याचे RBI च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याची क्षमता उरलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बँक सुरू ठेवणे हे ठेवीदारांच्या हिताविरोधात ठरू शकते, असे RBI ने म्हटले.
दरम्यान, या निर्णयामुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी बहुतांश ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार सुमारे ९९.०२ टक्के ठेवीदारांच्या ठेवी ५ लाख रुपयांच्या आत आहेत. त्यामुळे या खातेदारांना त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम परत मिळू शकते.
बँक लिक्विडेशन प्रक्रियेत गेल्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) अशा सर्व खात्यांतील एकूण रक्कम एकत्रित धरून हे विमा संरक्षण लागू होते. म्हणजेच एका व्यक्तीच्या एका बँकेतील सर्व खात्यांचा एकत्र विचार केला जातो. प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र ५ लाखांचे संरक्षण मिळत नाही.
DICGC ने २० एप्रिल २०२६ पर्यंत बँकेच्या ठेवीदारांना तब्बल १०६.९६ कोटी रुपयांची रक्कम आधीच वितरित केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे मानले जात आहे.
DICGC ही RBI ची उपकंपनी असून भारतातील सर्व व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमधील ठेवींना विमा संरक्षण देते. १ फेब्रुवारी २०२० पासून ठेवींवरील विमा मर्यादा १ लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली होती.
दरम्यान, खातेदारांनी सध्या काही महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. बँकेचे पासबुक, FD प्रमाणपत्रे, खाते कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती सुरक्षित ठेवावी. लिक्विडेटर नियुक्त झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच DICGC आणि RBI च्या अधिकृत वेबसाइटवरून सातत्याने अद्ययावत माहिती तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.