Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजुरा येथील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय मुसा किराडिया असे या वडिलांचे नाव असून एवढा मोठा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीला माहेरी सोडलं आणि त्यानंतर ४ मुलांसह स्वतःची जीवनयात्रा संपवली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय किराडिया यांच्या पत्नी काल घरगुती वादानंतर माहेरी गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर गावाकडे परतताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी घरात काम करत असताना त्यांच्या वडिलांनी पत्नीबद्दल विचारणा केली होती. त्यातून पुन्हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर विजय किराडिया आपल्या चारही मुलांना घेऊन राजुरा धरण परिसरात गेले. तेथे त्यांनी मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया यांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत जीवन संपवलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. घरगुती कलह आणि मानसिक तणावातून ही घटना घडल्याची शक्यता तपासली जात आहे. याप्रकरणी, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.