मुंबई : राज्यात यंदा ‘एल निनो’च्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गात दुष्काळाची भीती वाढू लागली आहे. मागील काही वर्षांत अतिवृष्टी, पूर आणि अवकाळी पावसाचा फटका सहन केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता संभाव्य पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे.
हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी संभाव्य दुष्काळ, पिकांचे नुकसान, सिंचनाची कमतरता, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींबाबत चिंता व्यक्त केल्याचे फाउंडेशनने सांगितले. अनेक शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीबाबत संभ्रमात असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती नियोजनावर परिणाम होत असल्याचेही दिसून येत आहे. (El Nino)
‘शिवार फाउंडेशन’चे प्रमुख विनायक हेगाना यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आधीच कमकुवत झाली आहे. अशातच ‘एल निनो’मुळे पावसात खंड पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकरी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाखाली आहेत. (El Nino)
त्यांनी पुढे सांगितले की, अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मानसिक आधार, योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे समुपदेशनही आवश्यक आहे. यासाठी शिवार हेल्पलाइनच्या माध्यमातून विविध समस्यांवर मार्गदर्शन, समुपदेशन आणि आवश्यक मदत पुरवली जात आहे. (El Nino)






