उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा भंग
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) उल्लंघन झाल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ६ जून रोजी झालेल्या या शासकीय सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रणच दिले गेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सिडको प्रशासन आणि अदानी नवी मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीला 'कारण दाखवा' (शो-कॉज) नोटीस बजावून तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फुटी कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे, शासकीय सोहळ्यात 'व्हीआयपी प्रोटोकॉल'च्या नियमांकडे डोळेझाक करून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दूर का ठेवले, याचा जाब मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि विमानतळ प्रशासनाला विचारला आहे. तसेच, भविष्यात अशा नियोजनात शिष्टाचाराचे नियम सक्तीने पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.