शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी, "उद्धव ठाकरेंनी आधी मुंबईतील आपले ६५ माजी नगरसेवक त्यांच्याकडे सुरक्षित राहतात की नाही हे पाहावे," असा गर्भित इशारा दिल्यामुळे या फुटीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे जे प्रमुख आमदार निवडून आले होते, त्यांच्यामध्ये आता लोकसभेतील घडामोडींमुळे प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघात विकासकामांसाठी लागणारा निधी आणि राजकीय भवितव्याच्या चिंतेपोटी या आमदारांच्या संभाव्य हालचालींविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही दिवसांत उबाठाचे दोन तृतीयांश खासदार आपल्या बाजूला वळवून त्यांची संसदेतील ताकद संपवून टाकली आहे. त्यामुळे उबाठा गटात कमालीचे वैफल्य आले आहे. खासदार हातचे गेल्यानंतर आता आमदार आणि नगरसेवकांची ही संभाव्य गळती रोखण्यासाठी उबाठाने 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसांत मुंबईत उबाठाच्या सर्व आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक 'मातोश्री'वर बोलावली जाणार आहे.