पावसाळ्यात समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून सध्या तो पंजाब-हरियाणाऐवजी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातून जात आहे. त्याचबरोबर वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. अरबी समुद्रात सुमारे ३.५ ते ४ किमी उंचीवर असलेली प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली कमजोर झाली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळ मिळून महाराष्ट्रात त्यांची प्रगती वेगाने होत आहे. शुक्रवार, २६ जूनपर्यंत विदर्भातील वातावरणात उष्णतेची तीव्र लाट तसेच रात्रीच्या उकाडा जाणवेल, अशी माहिती आयएमडी पुणे या संस्थेने दिली आहे.
दोन आठवड्यांपासून दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे स्थिर असलेल्या मान्सूनने आज पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, मुंबईसह राज्यातील इतर भागात लवकरच मान्सूनची वाटचाल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यात सध्या तुरळक ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. यंदा तळकोकणात ६ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. साधारणपणे १५ ते २० जूनच्या आसपास राज्यातील बहुतांशी भागात मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरीही राज्यात समाधानकारक पाऊस नोंदला गेला नाही. दरम्यान, रविवारपासून हवामानात बदल होत असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल आहे.