TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे पोलिसांनी (Thane Police)  भिवंडीत पर्दाफाश केला आहे. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या 'शिक्षक पात्रता परीक्षेचा' (TET) (Teacher Eligibility Test) पेपर चक्क दीड कोटी रुपयांना विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंनगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे परीक्षेच्या काही तास आधीच तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका 'ओरिजिनल' असल्याचे खुद्द शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



कसा रचला गेला सापळा ?


या संपूर्ण कारवाईची सुरुवात एका अत्यंत गुप्त आणि खात्रीलायक माहितीवरून झाली. भिवंडी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. पवन बनसोड यांना २७ जून रोजी टीईटीचा पेपर विकण्यासाठी काही जण भिवंडीत येणार असल्याची पक्की खबर मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी कोंनगाव परिसरात अचूक सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत टीईटीच्या प्रश्नपत्रिकेचे संच सापडले. तत्काळ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून खात्री केली असता, हा उद्या होणाराच मुख्य पेपर असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी तिघांनाही जागीच अटक केली.



दीड कोटींची डील आणि थेट परराज्य कनेक्शन!


या पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर पोहोचले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन आरोपी बिहारचे, तर एक जण हरियाणाचा रहिवासी आहे. या आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे तब्बल ४ सेट, मोबाईल फोन आणि काही डेबिट कार्ड्स जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पेपर तब्बल १.५ कोटी रुपयांना विकला जात होता. या टोळीने अन्य काही ठिकाणीही पेपरची विक्री केल्याचा दाट संशय आहे. सध्या या रॅकेटचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.



कोचिंग क्लासेस रडारवर


पेपरफुटीचे मुख्य स्त्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तांच्या मते, प्राथमिक तपासात तरी शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याचा यात सहभाग आढळून आलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांना पेपर पुरवण्यामध्ये खासगी कोचिंग सेंटर्सची मोठी भूमिका असू शकते, त्यामुळे परिसरातील अनेक 'कोचिंग क्लासेस' आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच पेपर छपाई केंद्रातून फुटला की अन्य कुठून, हे स्पष्ट होईल.



तपासासाठी धडक 'SIT'ची स्थापना


लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक 'विशेष तपास पथक' (SIT) स्थापन केले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड स्वतः या 'एसआयटी'चे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या दिमतीला सचिन सांगळे, डी. विजय मराठे यांच्यासह ९ पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अनुभवी अधिकारी देण्यात आले आहेत. ही प्रश्नपत्रिका या आंतरराज्य टोळीच्या हाती कशी लागली? त्यांनी महाराष्ट्रात कोणकोणत्या उमेदवारांशी आणि दलालांशी संपर्क साधला? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके आता परराज्यांत आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत रवाना करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर