मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महापालिका तसेच अनुदानित शाळा आणि महाविद्यालये आज बंद (School Holiday) ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील (Thane Rain) सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळाही आज बंद राहणार आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाच तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ( Maharashtra News)
पुणे जिल्ह्यातही काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने निवडक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासन आणि शाळांकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पावसादरम्यान नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.