- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची झालेली निवड ही पूर्णपणे कायदेशीर असून, पक्षाच्या घटनेनुसारच झाली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी दिली. सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान देणारे पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये सकृतदर्शनी कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत तटकरे यांनी दिले. या नोटीशीसंदर्भात पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (NCP President)
पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले, "सुनेत्रा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यासाठी बोलावण्यात आलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पूर्णपणे नियमानुसार होती. तिचे कामकाज आणि त्यानंतर झालेली निवड अत्यंत वैध पद्धतीने पार पडली आहे. त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या पत्राला किंवा नोटीसला कायदेशीर आधार नाही. आमचा पक्ष लोकशाही मार्गाने चालतो आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण पक्ष एकसंघ आहे. एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक पत्र लिहिले म्हणजे पक्षात असंतोष आहे, असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे. एका व्यक्तीचे मत म्हणजे पक्ष नाही." (Maharashtra politics)
या नोटीसची कायदेशीर वैधता तपासण्यासाठी लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. "माझा संबंधित व्यक्तीशी कोणताही संवाद झालेला नाही. दिल्ली पातळीवर काही चर्चा झाली असल्यास मला माहिती नाही. मात्र, आम्ही वकिलांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू आणि कोअर कमिटीच्या बैठकीत संबंधितांवर पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल," असा इशारा त्यांनी दिला.
राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद कधी?
राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थमंत्री पद कधी मिळणार असे विचारले असता तटकरे म्हणाले, "सध्या या खात्याची अतिरिक्त जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) सांभाळत आहेत. हे खाते आमच्या पक्षाकडे सोपवण्यात यावे, अशी राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल," असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.