तेहरान: अमेरिकेसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणमधील महत्त्वाच्या शहरांसह चाबहार बंदर आणि अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले असून, या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.(Iran)
दूतावासाने इराणमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध विमान सेवांचा वापर करून लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सद्यस्थितीत कोणत्याही कारणास्तव इराणचा प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आपला प्रवास तात्काळ पुढे ढकलावा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. भारतीयांनी लष्करी हालचालींचे प्रांतांपासून दूर राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशी ताकीदही देण्यात आली आहे.(Indian Embassy)
पश्चिम आशियातील या अस्थिर परिस्थितीमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम आशियातील विविध देशांमध्ये कोट्यवधी भारतीय रहिवासी व कामगार असून, या युद्धाच्या छायेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही अनेक भारतीय विशेष मोहिमांद्वारे सुरक्षितपणे परतले आहेत. अमेरिकेचे आक्रमक धोरण आणि इराणचा प्रत्युत्तराचा पवित्रा यामुळे निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीवर भारताचे परराष्ट्र मंत्रालय बारीक लक्ष ठेवून आहे.