नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याच्या पुनरागमनाबाबत वैद्यकीय पथक सावध भूमिका घेत आहे.
प्राथमिक तपासणीत किरकोळ वाटणारी गुडघ्यातील सूज अपेक्षेपेक्षा गंभीर असल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात भारतीय संघाचे व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक लक्षात घेता बंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या उत्कृष्टता केंद्रातील क्रीडा-विज्ञान विभाग बुमराहला घाईने मैदानात उतरवण्याच्या मनःस्थितीत नाही.
बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील लॉर्ड्स येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी बंगळुरूतील उत्कृष्टता केंद्रात दाखल झाला होता. मालिकेला सुरुवात होईपर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्यापही त्याला अस्वस्थता जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.
१५ ऑगस्टपूर्वी किंवा २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त झाला तरी त्याला थेट कसोटी क्रिकेटमध्ये उतरवणे योग्य ठरेल का, याबाबत वैद्यकीय पथक साशंक आहे. विशेषतः संथ खेळपट्ट्यांवर दीर्घकाळ गोलंदाजी करण्याचा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन कोणताही धोका पत्करला जाणार नाही.
बुमराहच्या अनुपस्थितीत त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबी किंवा विदर्भचा यश ठाकूर यापैकी कोणाला संधी दिली जाते, याकडे क्रिकेटवर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघेही स्नायूंच्या दुखापतीमुळे आधीच मालिकेबाहेर गेले आहेत. फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीत खेळू शकणार नसला, तरी कोलंबो येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे.






