या कार्यक्रमाला अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रिया बेर्डे, पद्मश्री राहीबाई पोपरे, पद्मश्री भिकल्या धिंडा, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हिना गावित, अभिनेते भरत गणेशपुरे आणि गौरव मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजातील कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच डॉ. अनबलगन पी., गिर्यारोहक अनिल वसावे आणि स्वदेश फाऊंडेशन यांना आदिवासी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ( Maharashtra)
यावेळी ‘नवरंग’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. आदिवासी कलादालन आणि साहित्य प्रदर्शनालाही मान्यवरांनी भेट दिली. पारंपरिक लोकसंगीत, तारपा नृत्य, विविध लोकनृत्य आणि हस्तकलेच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ( Chhagan Bhujbal)
आदिवासी समाजाने स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. बिरसा मुंडा, तंट्या भिल आणि राघोजी भांगरे यांसारख्या क्रांतिकारकांनी अन्यायाविरोधात लढा दिला. आदिवासी समाजाने जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि विकासाचा स्वीकार करताना आदिवासी समाजाने आपली भाषा, लोककला आणि परंपरा जपावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले. ‘वनरंग-2026’सारख्या उपक्रमांमुळे आदिवासी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्यांनी देशभरातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत पर्यावरणाचे रक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला. ( Tribal community)