Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon :जपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल, मात्र मध्य रेल्वेने एक वेगळा विक्रम केला आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फक्त भंगार विक्रीतून तब्बल २०२ कोटी रुपये कमावले आहेत. मध्य रेल्वेने (Central Railway) भंगार विक्रीच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, कोट्यवधी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, भंगार विक्रीतून २०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची मध्य रेल्वेची (Central Railway) ही आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. या कामगिरीत भुसावळ विभागाने (Bhusawal Division) ३३ कोटींपेक्षा अधिक भंगार विक्री करून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून, एकूण भंगार विक्रीत त्याचा मोठा वाटा आहे.



भंगार विक्रीतून तब्बल २०२ कोटी ५५ लाख


मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून मोठी आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल २०२ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. विशेष म्हणजे, २०० कोटींचा टप्पा गाठण्याची ही मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वात जलद कामगिरी ठरली आहे. या कामगिरीत भुसावळ विभागाचाही मोठा वाटा आहे. भुसावळ विभागाने ३३ कोटी १९ लाख रुपयांची भंगार विक्री केली असून, विभागनिहाय कामगिरीत भुसावळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई विभागाने ३६ कोटी ७८ लाख रुपयांची विक्री करत पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणे विभाग २७.२२ कोटी, नागपूर विभाग २६.१२ कोटी आणि सोलापूर विभाग १०.८५ कोटी रुपयांच्या विक्रीसह पुढे आहेत. उत्पादन युनिट्स व कार्यशाळांनी मिळून ६८.३९ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.



जुन्या साहित्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन


मध्य रेल्वेच्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर साहित्य विक्री करण्यात आली आहे. आतापर्यंत १७,७५५ मेट्रिक टन रेल्वे रूळ भंगार, १,२१,३८१ स्लीपर्स, ११,६५८ मेट्रिक टन लोहयुक्त भंगार आणि १,३७० मेट्रिक टन अ-लोहयुक्त भंगार विक्री करण्यात आले आहे. याशिवाय ११ लोकोमोटिव्ह, ३३ डबे आणि ३३ वॅगन्सचीही विक्री करण्यात आली आहे. भंगाराची वेळेत विल्हेवाट लावल्यामुळे रेल्वेच्या विविध परिसरातील जागा मोकळी होऊन तिचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करता येणार आहे. तसेच जुन्या साहित्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केल्याने पर्यावरणीय शाश्वततेलाही चालना मिळत आहे.



मध्य रेल्वेच्या धोरणाला बळ


मध्य रेल्वेने सर्व विभाग आणि डेपोंमध्ये ‘झीरो स्क्रॅप स्टेट्स’ अर्थात भंगारमुक्त स्थिती साध्य करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत साचलेल्या भंगाराची ओळख पटवून त्याचे वर्गीकरण, नोंदणी आणि वेळेत विल्हेवाट यावर भर दिला जात आहे. भुसावळ विभागाची ३३.१९ कोटी रुपयांची भंगार विक्री ही या मोहिमेतील महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. भंगाराचे रूपांतर महसूल मिळवून देणाऱ्या मालमत्तेत करून रेल्वेच्या आर्थिक संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या मध्य रेल्वेच्या धोरणाला या कामगिरीमुळे बळ मिळाले आहे.

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस