भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल मीडियाच्या चर्चेचा विषय ठरत असते. तिची फॅन फॉलोइंग एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. बऱ्याचदा तिचे नाव भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडले जात असले, तरी तिने यावर कधीही थेट भाष्य केलेले नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारा तेंडुलकरने पहिल्यांदाच तिच्या आयुष्यातील नातेसंबंध, लग्न आणि होणाऱ्या पतीबाबतचे विचार मनमोकळेपणाने मांडले आहेत.
आई-वडिलांचे नाते म्हणजे माझ्यासाठी आदर्श
'व्होग इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सारा तेंडुलकरने आपल्या कुटुंबाबद्दल आणि लग्नाबद्दल मोठे खुलासे केले. आपले आई-वडील सचिन आणि अंजली तेंडुलकर यांच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, त्यांच्या संसारात कायमच एक खेळीमेळीचे, चेष्टामस्करीचे आणि आनंदाने बहरलेले वातावरण पाहायला मिळाले आहे. मी लहानाची मोठी होत असताना त्यांचे हे सुंदर नाते अतिशय जवळून अनुभवले आहे. त्यामुळे जोडीदाराबाबत माझ्या काही विशिष्ट अपेक्षा आहेत. माझे आई-वडील कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात कायम एक हलकीफुलकी खडाजंगी असते. मला सुद्धा माझ्या होणाऱ्या जोडीदारासोबत अगदी तसेच, मैत्रीपूर्ण नाते हवे आहे.
लग्न घाईघाईत करण्याची माझी अजिबात इच्छा नाही
आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर भाष्य करताना साराने स्पष्ट केले की, फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा ठरवलेल्या वयात लग्न उरकून घेण्यासाठी मी कधीही घाई करणार नाही. जेनजी (Gen Z) पिढीबद्दल बोलताना ती म्हणाली की, आजच्या तरुणांना एखादी गोष्ट योग्य वाटली नाही, तर त्या नात्यातून बाहेर पडणे किंवा संबंध तोडणे सोपे वाटते. अनेकदा साखरपुडा झाल्यानंतरही जेव्हा लग्नाची तयारी सुरू असते, तेव्हा काहीजण "मला हे पुढे सुरू ठेवण्याची इच्छा नाही" असे म्हणून मागे हटतात. लग्नानंतर आयुष्यभर त्रास करून घेण्यापेक्षा लग्नाअगोदरच अशा नात्यातून बाहेर पडणे केव्हाही चांगले ठरते. जुन्या पिढ्यांना आपले मत मांडताना किंवा भूमिका घेताना भीती वाटायची, मात्र आजच्या पिढीत तसे चित्र दिसत नाही, असे तिने स्पष्ट केले. सचिन आणि अंजली तेंडुलकर आपले वैयक्तिक आयुष्य कायम प्रसिद्धीपासून दूर ठेवतात. अशातच साराने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि जोडीदाराच्या अपेक्षांबद्दल केलेल्या या खुलाशामुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा रंगली आहे.