Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि वाढती गर्दी लक्षात घेता, एक मोठा प्रस्ताव समोर आला आहे. भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मुंबई लोकल ट्रेनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे ३ डबे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. या नव्या प्रस्तावामुळे 'जनरेशन झेड' आणि 'जनरेशन अल्फा'च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रमुख सेवांमध्ये सकाळी ५ ते ११ या महत्त्वाच्या वेळेत ही विशेष सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चर्चगेट ते डहाणू आणि सीएसएमटी ते डोंबिवली किंवा आसनगाव या वर्दळीच्या मार्गांचा समावेश आहे. कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाणारे तरुण प्रवासी रोजच्या गर्दीत प्रचंड त्रस्त होतात. त्यांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी हे समर्पित डबे फायदेशीर ठरणार असल्याचा युक्तिवाद घोसाळकर यांनी केला आहे.
सध्या मुंबई लोकलमध्ये महिलांसाठी दोन, एक फर्स्ट-क्लास आणि एक सामानाचा डबा राखीव असतो. मात्र, पीक अव्हर्सच्या (गर्दीच्या वेळेत) वेळी इतर डब्यांमध्ये होणाऱ्या अतोनात गर्दीमुळे फर्स्ट आणि सेकंड क्लासमधील फरक जवळजवळ नष्ट होतो. अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी वेगळे ३ डबे आरक्षित झाल्यास त्यांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळू शकेल.
दुसरीकडे, या प्रस्तावामुळे प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई लोकलच्या आधीच प्रचंड भरलेल्या गाड्यांमधून जर नियमित प्रवाशांचे ३ डबे वजा केले, तर उर्वरित डब्यांमधील गर्दी अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या मागणीवर नेमका काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.