ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव केला. मंगळवारी झालेल्या पूल-D मधील दुसऱ्या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवलं. या विजयासह भारताने दोन सामन्यांतून 4 गुण मिळवत पूल-D मध्ये अव्वल स्थान पटकावलं असून, पुढील फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. भारतीय संघाने सामन्यात तब्बल सहा वेगवेगळ्या खेळाडूंकडून गोल नोंदवत आपली आक्रमक ताकद दाखवून दिली. सुनेलिता टोप्पोने 11व्या मिनिटाला भारताचं खातं उघडलं. त्यानंतर नवनीत कौरने 17व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये करत भारताची आघाडी 2-0 केली. पुढे सुशीला चानूने 25व्या मिनिटाला गोल करत भारताला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही भारतीय खेळाडूंचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. दीपिकाने 38व्या मिनिटाला शानदार टॉमहॉक शॉटद्वारे चौथा गोल केला. त्यानंतर लालरेम्सियामीने 44व्या मिनिटाला पाचवा गोल करत भारताचा विजय जवळपास निश्चित केला. अवघ्या एका मिनिटानंतर साक्षी राणाने 45व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून अखेरीस कायला डी वॉलने पेनल्टी कॉर्नरवर एकमेव गोल केला.
विशेष म्हणजे, हा महिला हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी 1974 मध्ये भारताने स्पेनचा 4-1 असा पराभव केला होता. यंदाच्या स्पर्धेत मात्र भारतीय संघाने त्यापेक्षाही मोठा विजय मिळवत इतिहास रचला आहे. भारताने स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बलाढ्य चीनला 2-2 बरोबरीत रोखलं होतं. आता भारताचा पूलमधील अखेरचा सामना 20 ऑगस्टला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारताला पुढील फेरीत पोहोचण्यासाठी या सामन्यात किमान एक गुण, म्हणजेच बरोबरी पुरेशी ठरणार आहे. दरम्यान, पूल-D मध्ये चीनने इंग्लंडचा 4-2 असा पराभव केल्यामुळे भारत आणि चीन प्रत्येकी 4 गुणांवर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा निकाल पुढील फेरीतील स्थान निश्चित करण्यात महत्त्वाचा ठरणार आहे.
पुरुषांच्या सामन्याकडेही लक्ष
दरम्यान, पुरुषांच्या हॉकी विश्वचषकात आज, 19 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. इंग्लंडकडून 2-4 असा पराभव झाल्यानंतर भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या खात्यावर 3 गुण असून पाकिस्तान आणि वेल्स प्रत्येकी 1 गुणांवर आहेत. भारताला पुढील फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी किमान बरोबरीची गरज आहे, तर पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. महिलांच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेला विक्रमी विजय आणि पुरुषांच्या संघासमोर उभं ठाकलेलं भारत-पाकिस्तानचं हायव्होल्टेज आव्हान यामुळे भारतीय हॉकी चाहत्यांसाठी विश्वचषकाचा थरार आणखी वाढला आहे.






