लखनऊ : जातीय आरक्षणाविरोधात तरुणांच्या नेतृत्वात दिल्ली एनसीआरसह ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर लखनऊ येथे आंदोलन करत असलेल्या तरुणांच्या प्रतिनिधींची उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी भेट घेतली. तरुणांशी चर्चा केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी महत्त्वाची माहिती दिली. केंद्र सरकार तरुणांच्या मागण्यांवर गांभिर्याने विचार करेल, असे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलकांना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी व्यक्त केला. आंदोलकांनी त्यांच्या मागण्यांचे एक पत्र दिले आहे. हे पत्र स्वीकारल्याचे ब्रजेश पाठक म्हणाले. त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.
जंतर मंतर येथे आंदोलन करत असलेल्यांकडून त्यांच्या मागण्यांचे एक पत्र मला मिळाले आहे. पत्रातील मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील. केंद्राकडून आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिले. लवकरच केंद्रीय मंत्री आंदोलकांशी चर्चा करतील आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ब्रजेश पाठक म्हणाले.
शुक्रवारी दिल्लीत जंतर मंतर येथे जातीय आरक्षणाच्या विरोधात मोठे आंदोलन झाले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी विविध पातळ्यांवर नेत्यांच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या जातीय आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा आणि आरक्षणाच्या व्यवस्थेची नव्याने रचना करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर केंद्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून गांभिर्याने विचार करेल असे सांगितले.






