नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घडामोडीत नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे, अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.
या आपत्कालीन परिस्थितीची गंभीर दखल घेत नांदेडच्या जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी किंवा स्वतः पर्यटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी तात्काळ संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. प्रशासनाद्वारे माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत यंत्रणेची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाशी संपर्क साधताना अडकलेल्या व्यक्तीचे नाव, सध्याचा मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे वास्तव्य असलेले ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा संपूर्ण तपशील आणि नातेवाईकाचा संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
संपर्क साधण्यासाठी खालील क्रमांकांचा वापर करावा:
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, नांदेड: 02462-235077
टोल फ्री क्रमांक: 1077
आपत्तीग्रस्त भागातील सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत योग्य समन्वय साधण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.