नेपाळ : नेपाळमध्ये तिबेटच्या हिमकडा कोसळण्याने आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडच्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आणखी एका मोठ्या संकटाची मालिका सुरू झाली आहे. चिखलात दबलेल्या आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरू असताना, पाण्याचा प्रवाह पुन्हा एकदा तिबेटच्या बाजूने वेगाने वाढत असल्याची धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. या नव्या धोक्याची दखल घेत नेपाळ सरकारने तातडीने अलर्ट जारी केला असून सर्व सुरक्षा यंत्रणा, पोलीस आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रत्येकाने आपल्या जवळच्या लोकांना धोक्याची कल्पना देऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या या विनाशकारी महापुरामागे एखादा तलाव फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, तिबेटमधील तलाव फुटल्यामुळेच पाण्याचा प्रचंड प्रवाह नेपाळच्या दिशेने आला असावा. मात्र, नेपाळ प्रशासनाने अद्याप या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. रसुवा जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनी अधिकाऱ्यांनी हा संदेश पाठवला असला तरी नेपाळी यंत्रणांकडून प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. शेकडो निष्पापांचा बळी घेणाऱ्या आणि अनेक जण बेपत्ता करणाऱ्या या आपत्तीमागचे नेमके कारण शोधण्यासाठी दोन्ही देशांचे प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.






