मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल असा दावा आता शिवसेनेकडून करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना हा दावा केला आहे. सध्या भाजपकडे अडीच वर्षांच्या काळाचे महापौरपद आहे, पुढील अडीच वर्षांतील पहिले सव्वा वर्ष शिवसेनेकडे आणि पुढील सव्वा वर्ष भाजपकडे महापौरपद राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शहराचे पालकमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नंदनवन येथे महापालिका वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. महापालिकेची सुरु असलेली विविध विकासकामे आणि प्रस्तावित विकासकामे आणि यामुळे महापालिकेचा बदलला जाणारा चेहरामोहरा तसेच महापालिकेच्या वारंवार होणाऱ्या खर्चाची बचत यावर प्रामुख्याने चर्चा केली. पत्रकारांशी संवाद साधताना महापौर पदाचा फॉर्म्युला काय असा सवाल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मुंबईच्या महापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांसाठी शिवसेनेला देण्याचे ठरले असल्याचा दावा शिंदे यांनी केला.
सध्या मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर असून महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. हा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेचा महापौर होईल. शिवसेनेचा महापौर सव्वा वर्ष या पदावर राहिल्यानंतर पुन्हा भाजपचा महापौर होईल आणि तो पुढील सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे शिंदे यांनी सांगितले.
महायुतीच्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेला सव्वा वर्षासाठी महापौरपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
नेविल डिसूजा मैदानाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही. दरम्यान, वांद्रे येथील नेविल डिसूजा फुटबॉल मैदानाचे कन्व्हेन्शन/प्रदर्शन केंद्रात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले.
सुधार समिती व महापालिका सभेत महापालिका प्रस्ताव मंजूर झाला असला तरी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्याची प्रक्रिया अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील मोकळ्या जागा वाढविणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. महालक्ष्मी रेसकोर्सचा काही भाग मुंबई कोस्टल रोडच्या मोकळ्या जागांशी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या प्रकल्पाचे कामही सुरू झाले आहे. मुंबईतील नागरिकांना अधिकाधिक मोकळ्या आणि सहज उपलब्ध जागा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी सांगितले.