- नदीत जाणारा कचरा आता थेट रोखला जाणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीतील रहिवाशांकडून वाकोला नदीमध्ये सतत कचरा टाकला जात असून यामुळे नदीला पाण्यापेक्षा कचराच अधिक प्रमाणात जमा होतो. त्यामुळे नदीत जाणारा हा कचरा रोखण्यासाठी आता वाकोला नदीच्या काठी जाळी बसवण्यात येणार आहे. वाकोला नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणारा कचरा दिसून येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. त्यानुसार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी पर्जन्य जलवाहिनी यांनी याठिकाणांना भेटी देत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीलगतच्या वाकोला नदीच्या संरक्षण भिंतीवरती जाळी बसविण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. (Vakola River Waste Prevention)
या नाल्याच्या भिंतीपासून सुमारे १० फूट उंचीची जाळी बसवण्यात येणार आहे. जेणेकरून नाल्यातील कचरा तथा तरंगणारा पदार्थ टाकण्यास प्रतिबंध होईल. अशा प्रकारच्या जाळ्या यापूर्वी मेन एव्हेन्यू नाला आणि दक्षिण एव्हेन्यू नाला येथे (एच/पश्चिम विभाग) बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. वरील बाबींचा विचार करून, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीलगत वाकोला नदीमध्ये कचरा टाकणे रोखण्यासाठी जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Vakola River Waste Prevention)
या जाळ्या बसवण्यासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या जाळ्या बसवण्याच्या कामांसाठी कल्पेश कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे २५ टक्के कमी दरात निविदेत भाग घेत त्यांनी हे काम मिळवले आहे. (Vakola River Waste Prevention)