- उडान योजनेअंतर्गत १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधीचा निर्णय; पर्यटन आणि व्यापाराला मिळणार नवी चालना
मुंबई : कोकण आणि मुंबईमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या असून, 'उडान' योजनेअंतर्गत प्रवाशांचे विमान भाडे अवघ्या ३ हजार ५८० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देऊन विमान कंपन्यांना आकर्षित करण्याचा विचार असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने व्यावसायिक विमान कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ( Navi Mumbai Sindhudurg Flight)
नव्याने विकसित झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सिंधुदुर्गच्या (चिपी) विमानतळाशी जोडणारी ही विमानसेवा कोकण किनारपट्टीच्या पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी प्रादेशिक विमान कंपन्यांमार्फत हा मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र ते अयशस्वी ठरले होते. आता हा मार्ग शाश्वत आणि स्वयंपूर्ण व्यावसायिक हवाई वाहतुकीसाठी खुला करण्यावर भर दिला जात आहे. योजनेच्या आकडेवारीनुसार, राज्य सरकार श्रेणी-२ विमानातील (४० ते ८० आसनी) ५० टक्के जागांसाठी आणि श्रेणी-३ विमानातील (८० पेक्षा जास्त आसनी) ३८ जागांसाठी १०० टक्के आर्थिक मदत देणार आहे. ई-निविदेनुसार, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग या ३७४ किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवासी भाडे ३ हजार ५८० रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी ३ हजार ७३५ रुपये निश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गावर प्रति सीट कमाल तिकीट दर ६ हजार ३७० रुपयांपर्यंत असणार आहे. ( Navi Mumbai to Sindhudurg)
ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेली परंपरा आणि ठाण्याच्या गोविंदा संस्कृतीची ओळख असलेली टेंभी नाका येथील मानाची दहीहंडी यंदाही मोठ्या ...
मोठ्या विमानांच्या उड्डाणासाठी परवाना
दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे विकसित आणि संचलित असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाला आधीच एअरबस 'ए३२१' विमानांसाठी परवाना मिळाला असून, तिथे आवश्यक पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध आहेत. उडान योजनेंतर्गत विमान कंपन्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले असून, सलग दोन महिने ७५ टक्के प्रवासी उपस्थिती न राखल्यास ऑपरेटरला व्हीजीएफ निधी मिळणार नाही, तसेच विमान विनाकारण थांबवून ठेवल्यास प्रतिदिन १ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या विमानसेवेमुळे मुंबईकरांना अवघ्या काही तासांत सिंधुदुर्ग गाठणे शक्य होणार असून कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठी भरारी मिळेल.