Saturday, September 5, 2026

Nepal Floods News : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १३०० हून अधिक बळी; बचावकार्यासाठी सैन्याकडून ताडी नदीवर 'रोप ब्रिज'ची उभारणी

Nepal Floods News : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १३०० हून अधिक बळी; बचावकार्यासाठी सैन्याकडून ताडी नदीवर 'रोप ब्रिज'ची उभारणी
नुवाकोट : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि ढगफुटीमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत तब्बल १,३४४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुराच्या वेढ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळचे सैन्य आणि आंतरराष्ट्रीय बचाव पथकांनी अत्यंत वेगाने मदत कार्य सुरू केले आहे. दुर्गम आणि संपर्क तुटलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

नद्यांना उधाण; दोरखंडाच्या साहाय्याने तात्पुरता पूल उभारणी

  पुराच्या मुसळधार पाण्यामुळे मुख्य रस्ते आणि पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा उर्वरित देशाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नुवाकोट जिल्ह्यात वाहणाऱ्या ताडी नदीचे रौद्ररुप पाहून सैन्याच्या अभियांत्रिकी तुकडीने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. या तुकडीने नदीवर दोरखंडाचा (रोप ब्रिज) वापर करून एक तात्पुरता पूल तयार केला आहे, जेणेकरून अडकलेल्या लोकांपर्यंत जमिनीवरून मदत आणि अन्नधान्य पोहोचवणे शक्य होईल.

धोकादायक हवामानात २० हेलिकॉप्टर्सद्वारे हवाई मोहीम

दुसऱ्या बाजूला, अत्यंत खराब हवामान आणि उंच पर्वतांचे आव्हान असतानाही हवेतून बचावकार्य राबवले जात आहे. नेपाळ लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, नुवाकोट आणि रसुवा या सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शोध व बचावकार्यासाठी सुमारे २० हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. पुरामुळे लँडिंगसाठी सुरक्षित जागा उरलेली नसतानाही, सैन्याचे वैमानिक अरुंद दऱ्यांमधून हेलिकॉप्टर्स चालवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत आणि अन्नाची पाकिटे खाली टाकत आहेत.

'चिलीमे टनेल'मधील पाणी उपसण्याचे काम पूर्ण

या कठीण प्रसंगात भारताने नेपाळला मोठी मदत केली आहे. रसुवा जिल्ह्यातील 'चिलीमे बोगद्यात' पुराचे पाणी आणि चिखल साचल्यामुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. भारताच्या विशेष टनेल रेस्क्यू टीमने नेपाळ लष्कराच्या सहकार्याने या बोगद्यातील साचलेले पाणी बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता बोगद्यात खोलवर जाऊन अडकलेल्या लोकांचा शोध घेणे आणि दुरुस्तीचे काम करणे शक्य झाले आहे.

वैद्यकीय मदत अन् अवजड उपकरणांसाठी तात्पुरता रस्ता

नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकार तांत्रिक मदतीसोबतच पीडित नागरिकांना मानवतावादी सहकार्य करत आहे. बोगद्याच्या मुखापर्यंत अवजड यंत्रसामग्री आणि हाय-कॅपेसिटी उपकरणे पोहोचवता यावीत यासाठी एक तात्पुरता रस्ता तयार केला जात आहे. याशिवाय, भारतीय पथकासोबत आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करून मोफत औषधे आणि वैद्यकीय तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >