Sunday, September 6, 2026

Vikram Pachpute : MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांची विद्यार्थ्यांशी चर्चा

Vikram Pachpute : MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांची विद्यार्थ्यांशी चर्चा

पुणे : MPSC विद्यार्थ्यांकडून उद्या पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत शिक्षकांनी विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा उद्याचा मोर्चा संविधानिक पद्धतीने होत असेल, तर सरकारचा त्याला विरोध नाही. मोर्चाला सरकारने परवानगी दिली असून, तो रद्द करण्याची सरकारची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर न करता ते सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत पाचपुते म्हणाले की, आयोग ही स्वायत्त संस्था असून अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. त्यामुळे सरकारला अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा किंवा घेण्याचा अधिकार नाही. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे हा संबंधितांचा वैयक्तिक अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करण्यास हरकत नसल्याचे सांगताना, मात्र त्या प्रश्नांचा तात्काळ राजकीय वापर करणे योग्य नसल्याचे पाचपुते यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून, सरकार सर्व प्रश्न ऐकून घेण्यास तयार असल्याचे पाचपुते यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही सदस्यांचा समावेश करता येईल का, याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. SIR प्रक्रियेबाबत बोलताना पाचपुते यांनी नियमानुसार पात्र नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी झाली असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अद्याप सुरू असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >