Sunday, September 6, 2026

China Masters : भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विक-चिरागला चायना मास्टर्सचे विजेतेपद

China Masters : भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विक-चिरागला चायना मास्टर्सचे विजेतेपद

शेन्झेन(चीन) : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. शेन्झेन एरिनामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात या भारतीय जोडीने चीनच्या 'हे जी टिंग' आणि 'रेन शियांग यू' या जोडीवर ११-२१, २१-१३, २१-१७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत चायना मास्टर्स'चे विजेतेपद पटकावले. भारतीय जोडीने आपली जिद्द आणि अनुभव पणाला लावला आणि अखेरीस १ तास १० मिनिटांच्या खेळानंतर चिनी जोडीवर विजय मिळवला. मे महिन्यातील 'सिंगापूर ओपन'मधील यशानंतर, या हंगामातील ही त्यांची दुसरी विजेतेपदाची कामगिरी ठरली.

पहिल्या गेममध्ये, चिनी जोडीने भारतीयांवर पूर्ण वर्चस्व गाजवले. या चिनी जोडीने या वर्षाच्या सुरुवातीला 'थायलंड ओपन' आणि 'बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप'च्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. चिनी जोडीचा वेग आणि खेळातील विविध युक्त्यांचा सामना करण्यात भारतीय जोडीला अपयश आले. तसेच त्यांच्याकडून अनेक 'अनफोर्सड एरर्स' झाले. 'हे' आणि 'रेन' या दोघांनीही उत्कृष्ट खेळ केला आणि काही अप्रतिम 'रिटर्न्स' मारत भारतीयांना गोंधळात टाकले. चिनी जोडीने आपल्या फटक्यांमध्ये उत्तम विविधता आणली. त्यांनी 'ड्रॉप शॉट्स' आणि 'अँगल रिटर्न्स'चा वापर करून दोन्ही जोड्यांमध्ये गुणांचे मोठे अंतर निर्माण केले आणि सहजपणे पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममधील पहिल्याच रॅलीमध्ये चिनी जोडीचे कौशल्य पुन्हा एकदा दिसून आले. भारतीयांनी निकराचा प्रयत्न करत ती रॅली ३९ शॉट्सपर्यंत लांबवली. पण अखेरीस चिनी जोडीने योग्य फटका मारत गुण मिळवला. चिरागने नेटजवळ मारलेले 'पुशेस' यावेळी तितकेसे प्रभावी ठरले नाहीत, कारण चिनी जोडीने उत्कृष्ट बचाव करत रॅली चालू ठेवली. तरीही, भारतीयांनी आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले आणि मोठी आघाडी घेतली. भारतीयांनी दबाव कायम ठेवल्यामुळे चिनी जोडीच्या खेळात त्रुटी दिसू लागल्या आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेमपर्यंत गेला.

तिसऱ्या गेममध्येही स्थानिक चिनी जोडीने पुन्हा एकदा वेगवान सुरुवात केली. चांगल्या सर्व्हिसेस आणि त्यानंतरच्या प्रभावी शॉट्सच्या जोरावर त्यांनी ४-० अशी आघाडी घेतली. सात्विक-चिराग जोडीने झुंजार खेळ केला असला, तरीही सामन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत चिनी जोडी आघाडीवरच राहिली. त्या क्षणापर्यंत हा सामना एखाद्या बुद्धिबळाच्या लढतीसारखा रंगला होता, ज्यात दोन्ही बाजूंनी जिद्द आणि चिकाटी दाखवल्यामुळे तो अत्यंत रोमांचक बनला होता. मात्र, भारतीय बॅडमिंटनपटूंनी सलग पाच गुण मिळवत सामना आणि विजेतेपद आपल्या नावे केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >