Thursday, September 10, 2026

Narendra Patil : जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊन समाजाला वेठीस धरणे चुकीचे

Narendra Patil : जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊन समाजाला वेठीस धरणे चुकीचे

- नरेंद्र पाटील; मराठा समाजाला भरभरून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना तोल सांभाळावा

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा टोकाची होत असून आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेठीस धरणे योग्य नाही, अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी गुरुवारी मांडली. मराठा समाजासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले असून त्यांच्याविषयी बोलताना आंदोलनकर्त्यांनी तोल सांभाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Narendra Patil)

मराठा समाजाला यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा फडणवीस यांनी अधिक दिले असल्याचा दावा पाटील यांनी केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. महामंडळाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहिल्याने लाभार्थ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आज सुमारे एक लाख ८० हजारांवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. (Narendra Patil)

२०१६ मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले आणि त्यानंतर मुंबईत महामोर्चाही झाला. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून या आंदोलनाला सामोरे जात विशेष समिती स्थापन केली. कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, या प्रश्नावर या समितीच्या माध्यमातून काम करण्यात आले, असे पाटील यांनी नमूद केले. त्याचबरोबर मराठा समाजातून उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नियमावलीत बदल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (Narendra Patil)

विविध महामंडळांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेला गैरव्यवहार आणि प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या कर्जावरील व्याज महामंडळामार्फत देण्याची योजना सुरू करण्यात आली. २०१८ पासून आतापर्यंत महामंडळाला किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून त्याचा लाभ एक लाख ८० हजार लाभार्थ्यांना झाला आहे, असा तपशील पाटील यांनी दिला. विविध विभागांमधून मराठा समाजाला सुमारे १८ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याचाही दावा त्यांनी केला. (Narendra Patil)

फडणवीस यांनी सुरू केलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. परदेशात शिक्षण घेण्यासाठी तसेच यूपीएससी आणि एमपीएससीच्या प्रशिक्षणासाठी मदत, उद्योजक घडविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आणि इतर उपक्रम राबविले जात आहेत. विशेष बाब म्हणून महामंडळाची सात विभागीय कार्यालयेही स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. (Narendra Patil)

या पार्श्वभूमीवर आंदोलनातील काही व्यक्तींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल केली जाणारी वक्तव्ये योग्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले. आंदोलनाची दिशा वेगळ्या पद्धतीने जात असून सणासुदीच्या काळात टोकाची भूमिका घेऊन उद्रेक निर्माण करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाची परंपरा एकेरी भाषेत किंवा शिवीगाळ करून भूमिका मांडण्याची नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. भाजपा आणि विशेषतः फडणवीस यांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांनी मराठा समाजासाठी काम केले आहे, त्यांच्या कामाचे कौतुक करता येत नसेल तरी त्यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणे आंदोलनकर्त्यांना शोभत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. (Narendra Patil)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >