Friday, September 11, 2026

MPSCच्या सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडवर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

MPSCच्या सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडवर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
मुंबई: नवी मुंबईतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यालयात घुसून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी संभाजी ब्रिगेडवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी दिला. आंदोलनाच्या नावाखाली अशा प्रकारे कायदा हातात घेणे योग्य नसून, एमपीएससी प्रकरणातील दोषींवर सरकारकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांवरून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडली होती.

आंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेणे अयोग्य

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवी मुंबईतील एमपीएससी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्याची घटना घडली. यासंदर्भात धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना कदम यांनी संभाजी ब्रिगेडला कारवाईचा इशारा दिला. “अशा प्रकारचे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवता येईल; मात्र त्यातून प्रश्न सुटणार नाही. एमपीएससीच्या प्रकरणात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे,” असे कदम यांनी सांगितले. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेची जबाबदारी स्वीकारताना संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या वतीने ही कारवाई केल्याचा दावा केला. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधातील ही प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले. सचिवांच्या चेहऱ्यावर काळे फासण्याच्या घटनेचे समर्थन करत त्यांनी सरकारवरही टीका केली.
दरम्यान, धाराशिवमध्येच कदम यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी अडविल्याची घटना घडली. कदम यांच्या ताफ्याला परंड्याकडे जात असताना आंदोलकांनी अडविले आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत सरकारच्या भूमिकेचा जाब विचारला. अचानक ताफा अडविण्यात आल्याने काही काळ घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >