Friday, September 11, 2026

Minister Dattatray Bharne : राज्यावर दुष्काळाचे सावट ! - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; पुढील ३-४ दिवसांत अहवालानंतर कार्यवाही करणार

Minister Dattatray Bharne : राज्यावर दुष्काळाचे सावट ! - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; पुढील ३-४ दिवसांत अहवालानंतर कार्यवाही करणार

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात सापडली असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत. राज्यातील परिस्थितीचा अहवाल पुढील तीन-चार दिवसांत प्राप्त झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली. तसेच कमी पाऊस झालेल्या भागांचा आपण पुढील आठवड्यापासून दौरा करणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले

पुण्यात माध्यमांशी बोलताना भरणे म्हणाले की, जूनमध्ये पाऊस झाला नाही, जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला. पुणे, कोकण आणि ठाणे परिसराचा काही भाग वगळता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी बैलपोळ्याच्या सणावरही परिणाम झाला असून शेतकरी नाराज असला तरी वर्षभर शेतकामात साथ देणाऱ्या बैलाची पूजा करण्याचे कर्तव्य म्हणून हा सण साधेपणाने साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आणि मजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांच्यासह काही आमदारांनी केली आहे. ही मागणी चुकीची नाही, असे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचे अहवाल मागविण्याचे निर्देश दिल्याचे नमूद केले. तीन-चार दिवसांत अहवाल आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले. कमी पावसाच्या परिस्थितीत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करेल, असे भरणे यांनी सांगितले. यापूर्वीच्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचे अनुभव फारसे चांगले नव्हते. मात्र, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले असल्यास त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय सर्वांना मान्य

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत विचारले असता, “सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल,” असे सूचक विधान भरणे यांनी केले. मुंढवा जमीन प्रकरणात युवा नेते पार्थ पवार यांच्याविषयी न्यायालयीन निरीक्षणांबाबत विचारले असता हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे भरणे यांनी सांगितले. या प्रकरणात पार्थ पवार यांचा काहीही संबंध नसावा, असे मत व्यक्त करतानाच या प्रकरणात सत्य समोर येईल, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >