Friday, September 11, 2026

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?
मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख जलाशयांमध्ये पाणी साठा भरलेला आहे. शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत जलाशयांमध्ये एकूण १३,९५,३३१ दशलक्ष लीटर पाणी जमा आहे. अर्थातच ९६.४१ टक्के पाणी साठा सध्याच्या घडीला सातही जलाशयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठा थोडा कमी आहे. २०२५ मध्ये याच दिवशी १४,०५,४३७ दशलक्ष लिटर म्हणजेच ९८.१८ टक्के, तर २०२४ मध्ये १४,१९,२७६ दशलक्ष लिटर म्हणजे ९८.०६ टक्के पाणीसाठा होता.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या सात जलाशयांमधील एकूण उपयुक्त क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर (एमएल) इतका पाणी पुरवठा असताना, सध्याच्या घडीला सातही जलाशयांमध्ये एकूण १३,९५,३३१ दशलक्ष लीटर पाणी जमा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण साठा ९८.१८ टक्के इतका होता. गेल्या २४ तासांमध्ये जलाशय क्षेत्रामध्ये ७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून १ जूनपासून ते आतापर्यंत तब्बल २७६६ मिमीपर्यंत पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जलाशय क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.   तर, गेल्या २४ तासांमध्ये, जलाशय क्षेत्रामध्ये, अप्पर वैतरणा जलाशय क्षेत्रामध्ये ४ मिमी पाऊसाची नोंद, तानसा जलाशय क्षेत्रामध्ये ५ मिमी पाऊसाची नोंद, तुळसी जलाशय क्षेत्रामध्ये ४ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. तर, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि विहार या जलाशय क्षेत्रामध्ये काहीही पाऊसाची नोंद झालेली नाही. अप्पर वैतरणा जलाशयातील पाणीसाठा ९२.३५ टक्के इतका आहे, तर मोडक सागर जलाशयातील पाणीसाठा ९९.८८ टक्के इतका आहे. हे धरण जवळपास संपूर्ण भरलेले आहे. तानसा जलाशयातील पाणीसाठा ९८.६१ टक्के इतका आहे, तर मध्य वैतरणा जलाशयामध्ये पाणीसाठा ९५. ७३ टक्के इतका आहे.
मुंबईतील सर्वात मोठे जलाशय आणि शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या भातसा जलाशयामध्ये ९७.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विहार तलाव १०० टक्के भरला असून तेथून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, तुलसी जलाशयात ९५.५८ टक्के इतका पाणीसाठा कायम आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत किंचित घट झाली असली तरी, मुंबईच्या जलाशयांमधील पाणी साठा समाधानकारक पातळीवर कायम आहे. एकूण पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पातळीपेक्षा खूप जास्त आहे. विहार तलावाचा ओव्हरफ्लो ७ जुलैपासून सुरू आहे. तानसा धरणाचा ओव्हरफ्लो २२ ऑगस्टपर्यंत सुरू होता. त्यानंतर तानसाच्या पाणीसाठ्यात थोडी घट झाली. मध्य वैतरणाचे WSCPO गेट सध्या बंद आहे. तसेच अप्पर वैतरणातून पाण्याचा विसर्ग ६ जुलैपासून बंद आहे. एकूणच, मुंबईच्या सात तलावांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची पातळी काहीशी कमी आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >