Thursday, September 17, 2026

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी दिल्ली जाहीरनामा' मंजूर करण्यात आला आहे. हा जाहीरनामा म्हणजे भारताची जागतिक पातळीवरील पत आणि मुत्सद्देगिरी सिद्ध करणारा एक मोठा पुरावा आहे, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी व्यक्त केला.

'सेमिकॉन इंडिया २०२६' च्या मंचावरून पंतप्रधानांचे वक्तव्य

नवी दिल्लीतील 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर' येथे आयोजित 'सेमिकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान बोलत होते. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "भारताने ब्रिक्स परिषदेचे अत्यंत यशस्वी आयोजन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध मतभेद असतानाही सर्वच देशांच्या पाठिंब्याने 'नवी दिल्ली जाहीरनामा' एकमुखाने मंजूर होणे, हे भारताच्या वाढत्या प्रभावाचे आणि विश्वासाचे स्पष्ट प्रतीक आहे."

पश्चिम आशियातील तणावातही भारताची मध्यस्थी यशस्वी

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पश्चिम आशियातील तणावावरून इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांमध्ये मतभेद समोर आले होते. मात्र, भारताने मुत्सद्दी मार्ग काढत सर्व सदस्य देशांना एका व्यासपीठावर आणले. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी या ऐतिहासिक जाहीरनाम्याची घोषणा केली.

भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी मोठी झेप

ब्रिक्स परिषदेच्या या मोठ्या यशानंतर लागलीच 'सेमिकॉन'सारख्या जागतिक दर्जाच्या परिषदेचे आयोजन होणे हा भारतासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे मोदींनी नमूद केले. ही तीन दिवसीय परिषद भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक, नवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

जगभरातून ५० हून अधिक देशांची हजेरी

या भव्य प्रदर्शनात जगभरातून ६०० हून अधिक प्रदर्शक, ३०० आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि ५० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडन या तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशांची विशेष दालने (कंट्री पॅव्हेलियन) उभारण्यात आली आहेत. याशिवाय, भारतातील १२ राज्य सरकारे आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या 'स्टार्टअप्स'साठीही या प्रदर्शनात स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >