Saturday, September 19, 2026

Devendra Fadanvis : दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामांवरून गदारोळ; मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रशासनाला संवेदनशीलतेचा सल्ला, विरोधकांनाही उत्तर

Devendra Fadanvis : दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामांवरून गदारोळ; मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रशासनाला संवेदनशीलतेचा सल्ला, विरोधकांनाही उत्तर

नागपूर : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नांदेड येथे पार पडलेल्या शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी काजू-बदामांचा नाश्ता ठेवल्याने मोठा वाद पेटला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis) यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रशासनाला खडे बोल सुनावत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

'प्रशासनाने वागण्यात संवेदनशीलता दाखवावी'

बैठकांमधील या प्रकारावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शासकीय बैठकीदरम्यान ड्रायफ्रुट्स ठेवण्याची प्रशासनाची एक ठराविक पद्धत किंवा सवय असते. मात्र, अशा प्रकारचा उधळपट्टीचा आव आणणे टाळले पाहिजे. दुष्काळ आहे म्हणूनच प्रशासनाने जाणूनबुजून असे केले असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल; तरीही अशा संवेदनशील काळात अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने वागण्याची अत्यंत गरज आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत

राज्यातील बिकट परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना आपापल्या पालकमंत्रालयाच्या क्षेत्रात परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या एका आठवड्यात पिकांचे प्राथमिक पंचनामे आणि आढावा घेण्याचे काम पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांपर्यंत तातडीची आर्थिक मदत पोहचवली जाईल.

कर्जमाफीसह चारा आणि वीजपुरवठ्यावर भर

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देताना फडणवीस म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या तीन याद्या जाहीर झाल्या असून उर्वरित काम वेगाने पूर्ण केले जात आहे. 'अल निनो'च्या धोक्यामुळे सरकारने आधीच वैरण विकास कार्यक्रम सुरू केला होता, त्यामुळे चारा टंचाई असलेल्या भागात तातडीने चारा उपलब्ध केला जाईल. याशिवाय, ज्या विहिरींना पाणी उपलब्ध आहे तेथील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना संध्याकाळच्या वेळी अतिरिक्त वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विरोधी पक्षाकडून दुष्काळाचे राजकारण; फडणवीसांचा पलटवार

विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले की, संकट काळात केवळ राजकारण करण्याची वाईट सवय विरोधकांना जडली आहे. दुष्काळाचे शासकीय नियम आणि जीआर विरोधकांना चांगले ठाऊक आहेत. एनडीआरएफच्या (NDRF) निधीची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकर्‍यांना मदत करत आहे आणि नंतर केंद्र सरकारकडे निधीची मागणी नोंदवत आहे.

पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि आगामी रणनीती

राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, सध्या मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असला तरी मराठवाड्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू नये म्हणून पाणी आरक्षित ठेवण्याचे धोरण आखण्यात आले आहे. पावसाचा पुढील अंदाज लक्षात घेऊनच या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जाईल, जेणेकरून ग्रामीण भागात टंचाई भासणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >