Saturday, September 19, 2026

IIT Bombay student suicide news : ChatGPT चा वापर अन् दुर्दैवी अंत! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; नक्की काय घडलं ?

IIT Bombay student suicide news : ChatGPT चा वापर अन् दुर्दैवी अंत! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; नक्की काय घडलं ?

मुंबई : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. साहिलच्या मानसिक स्थितीचा वेध घेणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या विशेष माहितीनुसार, या घटनेपूर्वी साहिलला कसलाही कौटुंबिक किंवा वैयक्तिक ताणतणाव नव्हता. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने त्याला हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, यावर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कॉपी करताना पकडल्यानंतरची घटनाक्रम

परीक्षा दरम्यान मोबाईलचा वापर करून ChatGPT वर प्रश्नपत्रिका अपलोड करणे आणि उत्तरे शोधणे याप्रकरणी साहिलला पकडण्यात आले होते. या घटनेनंतर संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी साहिलशी संवाद साधला होता. "कॉपी करताना पकडल्यानंतर प्राध्यापक आणि साहिल यांच्यात काही चर्चा झाली. कदाचित या संवादानंतरच साहिल अत्यंत अस्वस्थ झाला असावा आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे," अशी शक्यता एका सहकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.

"तो खूप उत्साही होता, अचानक काय घडले समजत नाही"

साहिलच्या सोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "साहिलवर असा कोणताही वैयक्तिक ताण नव्हता, उलट तो नेहमी खूप सक्रिय आणि उत्साही असायचा. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार घडला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही त्याच्या हॉस्टेलमधील खोलीवर गेलो, तेव्हा आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि दरवाजा उघडला गेला नाही. आम्ही आत प्रवेश केला तेव्हा तो मृत अवस्थेत आढळला."

विभागप्रमुखांनी दिले होते कारवाई न करण्याचे आश्वासन

या संपूर्ण घटनेवर आयआयटी प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, साहिल 'एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग'चा विद्यार्थी होता. त्याला कॉपी करताना पकडल्यानंतर विभागाच्या प्रमुखांनी (HoD) त्याच्याशी संवाद साधला होता. या प्रकरणात त्याच्यावर कोणतीही कठोर किंवा अनिष्ट कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही त्याला देण्यात आले होते. परंतु, या आश्वासनानंतरही शुक्रवारी संध्याकाळी साहिलचा त्याच्या हॉस्टेलच्या खोलीत मृतदेह आढळून आला.

विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पोलिसांचा बंदोबस्त

या धक्कादायक घटनेनंतर आयआयटी बॉम्बेच्या संपूर्ण परिसरात तीव्र असंतोष पसरला असून विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. साहिलच्या या अनैसर्गिक मृत्यूमागील खरी परिस्थिती आणि त्या तासांमध्ये घडलेला घटनाक्रम स्पष्ट व्हावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसर आणि आसपासच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >