Sunday, September 20, 2026

Mumbai Kalachowki Electrocution : काळाचौकी प्रकरणातील स्टॉल चालकावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai Kalachowki Electrocution : काळाचौकी प्रकरणातील स्टॉल चालकावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील काळाचौकी परिसरात गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित स्टॉल चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ ही दुर्घटना घडली. गणेशोत्सवामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या आणि थंडपेयांच्या स्टॉलजवळ विजेचा प्रवाह पसरल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, तात्पुरत्या वीजजोडणीशी संबंधित बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.(Mumbai Kalachowki Electrocution)

चिमुकलीसह महिलेचा मृत्यू

या दुर्घटनेत आठ वर्षीय रागिणी यादव आणि सुजाता (वय ३३) यांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागलेल्या अन्य चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये १२ वर्षीय रुही सिंह हिचाही समावेश असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

स्टॉल चालकाविरोधात गुन्हा

घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा बंद केला. पोलिस, अग्निशमन दल आणि BESTच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तात्पुरत्या वीजमीटरची जोडणी आणि त्यासंबंधित वायरिंगची तपासणी करण्यात आली. या प्रकरणी स्टॉल चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार FIR दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण, विद्युत सुरक्षेतील संभाव्य त्रुटी आणि संबंधितांची जबाबदारी यांचा तपास पोलीस करत आहेत. गणेशोत्सवाच्या गर्दीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे सार्वजनिक मंडपांमधील तात्पुरत्या विद्युत जोडण्या आणि सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Kalachowki Ganpati Pandal Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा