Sunday, September 20, 2026

Lalbagcha Raja News: जबरदस्त,'प्रसाद ते उर्जा'; ‘लालबागच्या राजा’च्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार

Lalbagcha Raja News: जबरदस्त,'प्रसाद ते उर्जा'; ‘लालबागच्या राजा’च्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार
मुंबई: मुंबईमध्ये अनेक प्रसिद्ध मंडळांकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यासह संपूर्ण देशभरातून करोडो भाविक मुंबईतील गणेशोत्सव पाहायला येतात. गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयाने एक स्तुत्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे नाव, 'प्रसाद ते उर्जा' असं असून मंडळाच्या प्रसाद कक्षातून आणि अन्नछत्रातून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन प्रक्रिया करण्यात येणार आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बीएमसीच्या एफ दक्षिण वॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतलेल्या एका अभिनव उपक्रमांतर्गत, गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजा प्रसादालयातून निर्माण होणाऱ्या सुमारे ४४ मेट्रिक टन उरलेले अन्न आणि ओला कचऱ्याचे विजेमध्ये रूपांतर केले जाणार आहे. गणेशोत्सवामध्ये दररोज साधारण चार मेट्रिक टन अन्न आणि जैविक कचरा कचरा निर्माण होतो. गोळा केलेला कचरा बीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून शिवडी टीबी रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय आणि सायन रुग्णालय या चार पालिका रुग्णालयांमध्ये पोहोचवला जातो. एरोकेअर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून एरोशक्ती नावाच्या मशीनच्या माध्यमातून रुग्णालयांच्या आवारात बायोमिथेनेशन प्रकल्पापर्यंत कचरा पोहोचवण्यात येणार आहे.
ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन प्रक्रियेद्वारे बायोगॅस आणि वीज निर्माण केली जाते, ज्याचा उपयोग नंतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. निर्माण झालेली वीज रुग्णालयातील सुमारे ७० पंखे आणि २० ट्यूबलाइट चालवण्यासाठी पुरेशी असते. प्रत्येक प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता सुमारे २ मेट्रिक टन प्रतिदिन आहे. या उपक्रमांतर्गत ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे ७ हजार ७४४ युनिट नवीकरणीय वीज निर्माण करण्याचे नियोजन आहे. गणेशोत्सवामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण विजेच्या निर्मितीमुळे दररोजच्या वीज खर्चात दररोज अंदाजे ५७६ रुपयांची बचत अपेक्षित आहे. ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान सुमारे ६,५०० रुपयांची बचत होईल. एफ दक्षिण वॉर्डाने यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान गोळा केलेल्या चप्पलांवर प्रक्रिया करून, आदिवासी विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला होता. हा नवीन प्रकल्प उरलेले अन्न आणि ओल्या कचऱ्याचे विजेमध्ये रूपांतर करून कचरा व्यवस्थापन उपक्रमाला एक पाऊल पुढे नेतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >