अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले असले तरी, भारताने कॅनडावर ५-३ असा विजय मिळवून २४ व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली.
रुपिंदर पाल सिंगने (१३) व्या आणि व्ही.आर.रघुनाथने (३२) व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करुन भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
कॅनडाकडून ऑलिव्हर स्कोहोलफिल्डने (४३) व्या मिनिटाला कॅनडासाठी पहिला गोल केला. मात्र त्यानंतर तीनच मिनिटात रमनदीप सिंगने (४६) व्या आणि (४७) व्या मिनिटाला लागोपाठ दोन मैदानी गोल करत भारताची आघाडी वाढवली. सतबीर सिंगने (४९) व्या मिनिटाला भारतासाठी पाचवा गोल केला.
कॅनडाकडून जगदीश गिलने आणि डेव्हीड जेमसनने (५२) व्या मिनिटाला तिसरा गोल केला. याआधीच्या सामन्यांमध्ये शेवटच्या मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याची संधी दिल्यामुळे सामना गमावणा-या भारताने यावेळी अशी कोणतीही चूक न करता सामना ५-३ च्या फरकाने जिंकला.
याआधी दक्षिण कोरियाविरुध्दचा सामना बरोबरीत सोडवल्यानंतर न्यूझीलंड आणि मलेशियाकडून पराभव झाल्याने भारताचे अंतिम फेरीचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत कॅनडाचा संघ १५ व्या तर, भारतीय हॉकी संघ ९ व्या स्थानावर आहे.