Home कोलाज अरण्यभाषा

अरण्यभाषा

0

वारंवार जंगलांमध्ये भटकंती करायला जाणा-यांना तिथल्या वाटा, तिथला गंध, तिथला परिसर, तिथले आवाज हे एवढया ओळखीचे झालेले असतात की रात्रंदिवस कधीही, कुठेही ते अरण्य त्यांच्या मनात जिवंत असतं. अनेकदा शहरात राहूनही त्यांना त्या जगाकडून साद येत असते, तिथले आवाज ऐकू येत असतात. त्यांना खुळावून टाकणारी असते ही अरण्यभाषा.

आयुष्यात प्रथमच अरण्यात जाणारा शहरी मनुष्य, जंगलांमध्ये जगता जगताच प्राचीन झालेला तिथला स्थानिक आणि शहरातून एका प्रचंड ओढीने तिथे जाणारी व्यक्ती या तिघांमध्ये खूप फरक असतो. मात्र या तिघांनाही भारावून टाकते ती अरण्यभाषा. जंगलाच्या अंगाखांद्यावर खेळत मोठं झालेल्या आदिवासी किंवा इतर स्थानिकाला जंगलाची ही भाषा आपसूकच येऊ लागते.

शहरातून जाणा-या माझ्यासारख्या वन्यजीव व निसर्गप्रेमींना मात्र आजूबाजूचं हे अरण्य काय सांगतंय ते सरावानेच कळू लागतं. त्यासाठी अर्थातच तन-मन-धन ओतून जंगलांवर, तिथल्या वृक्षांवर, प्राणी-पक्ष्यांवर प्रेम करावं लागतं. ही प्रक्रिया खूप निरंतर आहे, पण एकदा का याचं वेड लागलं की ती थांबत नाही.

कधीकाळी पहिल्यांदा घाबरत, कोणाच्या तरी सोबतीने जंगलात पहिलं पाऊल टाकलेलं असतं तेव्हा सभोवतालच्या गर्द सावल्यांनी व अगदी गारव्यानेही अस्वस्थ केलेलं असतं, पण काही काळाने अशी वेळ येते की शहरात परतल्यावर अस्वस्थ वाटू लागतं. जीवाच्या आतमध्ये सारखं काहीतरी खोलवर जाऊन उसळून यावं असं होत राहतं; तो गारवा, त्या सावल्या, ते तळ्याकाठचे क्षण, ती सळसळ, ती शांतता पुन्हा पुन्हा अनुभवावी, ते सर्व काही आत्ता या क्षणाला आपल्या जवळच उभं राहावं असं वाटू लागतं आणि जंगलात पाऊल पडत नाही तोपर्यंत चित्ताला काही थारा लागत नाही.

तसं म्हटलं तर काय असतं तिथे, एखाद्या नवख्याने पाहिलं तर त्याला इथे झाडेच दिसतील; पण त्यावरचा नीळकंठ नाही दिसणार. दाट गच्च माजलेलं गवत-झाडोरा दिसेल; पण त्याआडचं भेकर नाही दिसणार. वेडंवाकडं पसरलेलं तळं दिसेल; पण त्या तळ्याच्या काठच्या चिखलात उमटलेल्या प्राण्यांच्या पावलांच्या खुणा नाही दिसणार. तिथल्या पाऊलवाटांना तो रस्ते म्हणेल, त्या खडकाळ रस्त्यांनी त्याचं अंग चांगलंच तिंबून निघेल आणि स्वत:कडे लक्ष देता देता त्याचं त्याच पाऊलवाटांवर पडलेल्या रानमेव्याकडे लक्षच जाणार नाही.

तिथली रात्र त्याला भीतीदायक वाटेल, तर एखाद्या अस्सल जाणकाराला त्या रात्रीच्या पडद्याआडून येणारे विविध हाकारे झोपू देणार नाहीत. कधी एकदा पहाट होतेय आणि बाहेर रानात जातोय असं त्याला होऊन जाईल. हे असंच असतं. जीव अस्वस्थ होऊ लागला, कासावीस होऊ लागला की आमच्यासारख्या भटक्यांना कोणती आस लागलीये ते आपोआपच समजतं. पावलं मग तिथेच वळतात.

शहरातल्या कृत्रिम सुगंधी श्वासांच्या कुबडया भिरकावून देऊन रानातला तो अरण्यगंध पुन्हा एकदा श्वासात मनमोकळा, हवा तेवढा भरून घेण्यासाठी धडपड सुरू होते. तो प्राणवायूच जणू असतो. तिथल्या सग्यासोबत्यांना भेटल्याशिवाय मग चैन पडत नाही. कॉर्पोरेट लॉबीत मऊ कारपेटमध्ये टाचा घुसवून चालणा-या जंगल भटक्यांना मग कधी एकदा तो पालापाचोळा पायाखाली येतोय असं होऊन जातं.

एकदा का जंगलात गेलात की तुम्हाला ते प्रेमाचा विळखाच घालतं. हा बंध मग आयुष्यभर सोडवत नाही. तिथेच मन भिरभिरत राहातं. तिथले आवाज कानात मग शहरात येऊन देखील कानात उमटत राहतात. हे आवाज अनोळखी असतात परक्यांसाठी, पण कायम जंगलवाचन करणाऱ्यांसाठी ती अरण्यभाषा असते. ती तिथली बोली असते. जिच्यात अनेकांची साद दडलेली असते.

ज्यावेळी जंगलात जाणं शक्य होत नाही त्यावेळी मनाला समजवावे लागते. असंच एकदा सहज मनाला गुंतवण्यासाठी आमिष म्हणून इंटरनेटवर जरा शोध घेतला. समोर आली ती प्रत्यक्ष या अरण्यबोलींची रेकॉìडग्स. आज इंटरनेटवर अनेक संकेतस्थळांवर कितीतरी पक्षी-प्राण्यांचे आवाज उपलब्ध आहेत. अर्थात त्यांचे नमुने हे मोफत ऐकायला मिळतात व बाकी ध्वनिमुद्रण हे विकत घेऊन ऐकावे लागते.

यात जगाच्या पाठीवरील अनेक जंगलांमध्ये टिपलेले आवाज आहेत. जंगलात गेल्यावर हेच आवाज निसर्गप्रेमींना नादावून टाकतात. ते मधुर बोल ऐकण्यासाठी जीव तहानतो. मात्र जाऊ शकत नसाल तर इंटरनेटवर तीही सोय आहे. पण ही सोय अशी सहजासहजी होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे, तासन् तास, दिवस-रात्र अरण्यात मुक्काम ठोकावा लागतो.

शहरात बसून तुम्ही जंगलात भटकता म्हणजे तुमची मजा आहे बुवा असं वाटत असेल, तर असं सांगावंसं वाटतं की जंगलात जाऊन साऊंड रेकॉडिंग(ध्वनिमुद्रण) करणं ही मजा बिलकूल नाही. तिथे अथक कष्ट आहेत म्हणूनच त्याचे पैसे द्यावे लागतात. शिवाय तुमच्या दारापर्यंत आजकाल कोणतीही गोष्ट आणून ठेवली की त्याचे पैसे हे घेतले जातातच, मग हे तर थेट अरण्यातूनच आणलेले आवाज!

देशी-विदेशी वन्यजीव प्रेमी, अभ्यासक, संशोधक हे जंगलात जाऊन आवाज ध्वनिमुद्रित करतात. जंगली पक्ष्याचं पहिलं रेकॉìडग हे लुडविग कोह याने एडिसन फोनोग्राफवर १८८९ मध्ये केलं होतं. पण हे पिंज-यातील पाळीव पक्षी होते. मग युरोपात असं ध्वनिमुद्रण करण्याची लाटच पसरली. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, रशिया इ. देशांमध्ये कॅनरी बर्डस, नाईटिंगेल, थ्रश, ब्लॅकबर्ड, गार्डन वॅबलर असे कितीतरी आवाज पिंज-यात ठेवलेल्या पाळीव पक्ष्यांचे ध्वनिमुद्रित होऊन त्याच्या रेकॉर्डसही विकल्या जाऊ लागल्या.

हा प्रकार तेव्हा अत्यंत लोकप्रिय झाला होता. परंतु प्रत्यक्ष जंगलात जाऊन अशा आवाजांचं ध्वनिमुद्रण करण्याची सुरुवात केली ती बर्नी क्रॉस या अमेरिकन ध्वनिमुद्रण तज्ज्ञ व संगीतकाराने. एका सांगितीक आल्बमसाठी त्यांनी काही आवाजांचं प्रत्यक्ष जंगलात जाऊन ध्वनिमुद्रण केलं आणि तेव्हा मुळातच निसर्गप्रेमी असणा-या बर्नी यांना आपण हे सर्व आवाज ध्वनिमुद्रित करून ठेवले पाहिजेत असं वाटलं.

आजपर्यंत गेली ४५ वर्ष त्यांनी वन्यजीवन आणि निसर्गाच्या प्रेमापोटी सुमारे १५ हजार पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. यात त्यांची मेहनत प्रचंड व वाखाणण्याजोगी आहे. बायोफोनी म्हणजे मनुष्याव्यतिरिक्त इतर नसर्गिक अधिवासातील आवाज, हा शब्द त्यांनीच निर्मिला. हे आवाज रेकॉर्ड करणं हे खूप कठीण आणि नाजूक काम आहे. आज पशू-पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील आवाज ध्वनिमुद्रित करण्याच्या क्षेत्रात बर्नी क्रॉस हे अखेरचा शब्द मानले जातात.

परंतु अजून एका बाबतीत देखील बर्नी यांचे शब्द अखेरचे व चिंतादायक मानले पाहिजेत. ते म्हणतात की, मी ४५ वर्षापूर्वी जाऊन जी रेकॉìडग्स केलीत, त्यांच्यात आणि आज त्याच जागी जाऊन केलेल्या, त्याच पक्ष्यांच्या आवाजांच्या रेकॉìडगमध्ये खूप फरक जाणवतोय. हा सरळसरळ लोकसंख्या वाढल्याचा व मनुष्याचा निसर्गात होणा-या हस्तक्षेपाचा प्रभाव आहे.

कितीतरी पक्ष्यांच्या-प्राण्यांच्या प्रजाती त्यांना नष्ट होताना दिसल्या आहेत. ४५ वर्षापूर्वी ध्वनिमुद्रित केलेले आवाज आज ध्वनिमुद्रित करण्यासाठी उपलब्ध नाहीत. शिवाय त्याच जातीचा पक्षी आज सापडला तरीही त्याच्या आवाजाच्या दर्जात खूप फरक पडलेला दिसेल. या दोन्हींचं कारण म्हणजे आज पूर्वीच्या प्रजाती उरलेल्या नाहीत. त्यांच्यात घट होतेय.

मनुष्याने जंगलांची अपरिमित हानी चालवली आहे. त्यामुळे पूर्वीची गर्द अरण्यं आता उरलेली नाहीत. परिणामत: पक्षी-प्राणी नामशेष होत चाललेत. हा ‘ग्रेट अ‍ॅनिमल ऑर्केस्ट्रा’ लवकरच बंद पडेल असं बर्नी म्हणतात. जंगल हळूहळू शांत होतंय असा भीतीदायक इशारा ते देतात. हा इशारा जगभरातील तज्ज्ञ, निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी दिलाय. तो खरा होऊ लागला आहे. वेळ आहे ती तुमच्या-आमच्या परिसरातील अरण्यं, वृक्षवल्ली, सागरकिनारे, तिथल्या पशू-प्राण्यांना वाचवण्याची.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version