आपला भारत देश तर दहशतवादाच्या समस्येला सातत्याने सामोरा जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच सामाजिक सुरक्षा गरजेची आहे. सामाजिक सुरक्षेचं महत्त्व लक्षात घेऊन घरटी किमान एका माणसाने आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतल्यास प्रशासनाला आणि समाजालाही त्याची फार मोठी मदत होऊ शकते. नागरी संरक्षण दलांमधून अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळू शकतं.
सामाजिक सुरक्षा आपल्या घरापासून सुरुवात होणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात दक्ष राहणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील विविध प्रश्न आणि अडचणी पाहता सुख-शांती, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी विविध कमिटी, मंडळांमार्फत जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. यासाठी स्वत: दक्ष राहून आपले कान व डोळे शाबूत ठेवून आपल्या परिसरात अशा गोष्टी घडणारच नाहीत, यांची जागृत नागरिक म्हणून योग्य भूमिका घेणं काळाची गरज आहे. यासाठी एकमेकांचा आदर करणं, प्रतिसाद देणं, समन्वय साधणं, विचारांची देवाण-घेवाण करणं, विविध उत्सव-समारंभ यातून योग्य संवाद साधणं, चर्चा करणं, त्यातून प्रश्नांची सोडवणूक होऊन सामाजिक सुरक्षितता वाढेल. ज्याप्रमाणे दो-यामध्ये फुलं गुंफली जातात, त्यातून सुंदर, सुबक, सुवासिक गजरा निर्माण होतो, तशी गुंफण समाजामध्ये होणं अपेक्षित आहे. यातूनच आपल्या समाजाची, देशाची प्रगती होईल. समाज सुधारण्यासाठी नागरिक सुधारणं गरजेचं आहे.
मानवाने नवनवीन शोध लावले. त्याचा वापर चांगल्या कामासाठी कमी, तर विध्वंसक वृत्तीसाठी जास्त करू लागला. १६ जुलै, १९४५ रोजी न्यू मेक्सिकोतील वाळवंटात जगातील पहिला अणुस्फोट करण्यात आला. त्या प्रकल्पाचे प्रमुख होते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. होपेन हाइमर. यानंतर सहा ऑगस्ट १९४५ व नऊ ऑगस्ट १९४५ रोजी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. दहशतवादी हल्ले व अन्य आपत्तीप्रसंगी बाहेरून मदतकार्य येण्याअगोदरच आपणच आपल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सहकार्य करू शकतो. त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो.
देशाची औद्योगिक राजधानी व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई शहराचं महत्त्व लक्षात घेता बृहन्मुंबइंचं क्षेत्रफळ ६०३ चौ. कि. मी. असून लोकसंख्येचा विचार करता संभाव्य धोके टाळण्यासाठी बृहन्मुंबई नागरी संरक्षण दलाच्या व्यवस्थापनासाठी एकूण चार क्षेत्रे, २४ विभाग व ५४० वॉर्डन पोस्ट असून २४ उपनियंत्रक केंद्रे व आगार अस्तित्वात येणार आहेत.
नागरी संरक्षण कामाच्या सुलभतेसाठी १५ सेवांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मुख्यालय सेवा, प्रशिक्षण सेवा, क्षेत्ररक्षक सेवा, संदेशवहन सेवा, आगार आणि दळणवळण सेवा, रुग्ण सेवा, अग्निशमन सेवा, विमोचन सेवा, पुरवठा सेवा, मृतदेह विल्हेवाट सेवा, नष्ट सेवा मालमत्ता मापन, कल्याणकारी सेवा, किरणोत्सर्ग निर्मूलन सेवा, स्थलांतर सेवा यांचा यात समावेश होतो. या सेवांतर्गत ‘लालबागचा राजा’ गणपती बंदोबस्त, महालक्ष्मी मंदिर-नवरात्रोत्सव बंदोबस्त, माउंट मेरी जत्रा बंदोबस्त, निवडणूक बंदोबस्त, लोकसभा/विधानसभा सार्वजनिक निवडणूक, लातूर, उस्मानाबाद, गुजरात या ठिकाणी झालेल्या भूकंपाच्या वेळी, तसंच ओरिसात झालेल्या चक्रीवादळाच्या वेळी या दलातील जवान मदतकार्यात कार्यरत होते. ही सर्व मदतकार्य लक्षात घेता व संभाव्य (बॉम्बहल्ले, जातीय दंगल) धोक्यांना सामोरे जाण्यासाठी या दलातील जवानांना छोटी आग विझविण्याचं, लोकांच्या जीविताचं, संपत्तीचं संरक्षण करणं, देशाच्या उत्पादन केंद्रांची जपणूक करणं, दळणवळणाचे मार्ग सुरक्षित राखणं, इमारतीतून व्यक्तींची सुटका करणं, त्यांना प्रथमोपचार देणं, न फुटलेले बॉम्ब शोधणं, पोलिसांना मदत करणं अशा विविध कार्यातून स्वत:चा जीव वाचवून दुस-याचा जीव कसा वाचवता येईल याचं प्रशिक्षण या दलातील जवानांना शिस्तबद्ध व कमी वेळात ‘निष्काम सेवा’अंतर्गत देण्यात येतं. समाजातील प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतल्यास स्वत:चा जीव वाचवतानाच देशाचंही संरक्षण करण्यास हातभार लावता येईल.
आपण उपरोक्त लेखा मध्ये नागरी संरक्षा बाबत महत्वाची व गरजेची माहिती दिली आहे. परंतु मुंबई येथे असलेल्या दलाबाबत कोणत्या अधिकाऱ्याला भेटावे, व प्रशिक्षणाबाबत माहिती मिळविता येईल, त्यांचे संपर्क क्रमांक याबाबत माहिती मिळाल्यास आभारी आहे.