गावच्या विकासासाठी कधीही आणि केव्हाही मला हाक द्या; मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन, असे अभिवचन कणकवली, देवगड, वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी दिले.
पियाळी-गडमठ शिवगंगा नदीवर दशक्रोशीला जोडणा-या पुलाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या भूमिपूजन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. विकासकामांप्रती जनतेत असणारी जागरूकता महत्त्वाची आहे. केवळ लोकप्रतिनिधी सर्व काही करतील म्हणून थांबू नका, तर त्यांचा सातत्याने पाठपुरावा करत राहा आणि विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून घ्या, असे आवाहनही आमदार राणे यांनी या प्रसंगी केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्य विभावरी खोत, कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या पुलासाठी १ कोटी ६० लाख रुपये नाबार्ड योजनेंतर्गत प्राप्त झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने व माजी सभापती संतोष कानडे यांच्या पाठपुराव्यानंतर हा पूल मंजूर झाला आहे. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील जवळपास १० ते १५ गावांना या पुलामुळे फायदा होणार आहे.