पुराच्या विळख्यात अडकलेल्या जम्मू-काश्मीर राज्यास मदत करण्यासाठी इतर राज्येही पुढे सरसावली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जम्मू-काश्मीरसाठी २० कोटी रुपये मदतीची घोषणा केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मंझी यांनी १० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिहारसोबतच उत्तराखंड राज्याकडून जम्मू-काश्मीरसाठी १० कोटी तर ओदिशा सरकारने पाच कोटींची मदत जाहीर केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पुराचा हाहाकार सुरु आहे. २०० हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुमारे सहा दशकानंतर काश्मीरमध्ये इतका मोठा महापूर आला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या ४३ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे तर चार लाख नागरिक अद्याप अडकले आहेत.