नुकताच आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला. या निमित्ताने आपल्या देशाच्या एका संपत्तीला पोखरणारी एक कीड पाहून मन हळहळलं. ही संपत्ती म्हणजे देशाला लाभलेली सर्वात मौल्यवान संपत्ती, ती आहे देशातील तरुणाई. सध्या फक्त झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गातून आलेली तरुण मंडळीच नव्हे तर, अगदी विदेशी गाडय़ांमधून फिरणारा तरुण वर्ग, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारा वर्गदेखील व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसतो. व्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट बनलंय हेच खरे आहे.
आनंद साजरा करण्याची पद्धत बदलत चालली आहे. बरं, हल्ली यात मुलीही मागे नसतात. कित्येक मुलीदेखील स्टेटस म्हणून मुलांसोबत दारू पिताना दिसतात. शँपेन फोडून ती मित्रमंडळींसह रिचवून आनंद साजरा करण्याच्या पाश्चिमात्त्य संस्कृतीचे आपण अनुकरण करू लागलो आहोत. आनंद किंवा सेलिब्रेशनचा दारूशी अन्योन्य संबंध जोडला जात आहे. दारूशिवाय आनंद साजरा केला जात नाही आणि जी मंडळी दारूकामात भाग घेत नाहीत, त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाच नाही असे समजले जाते.
आजकालच्या तरुण पिढीला व्यसन करणे ही खूप साधी गोष्ट वाटते. आपल्या आजूबाजूच्या हायक्लास म्हणजे उच्चभ्रू लोकांमध्ये राहायचे असेल तर त्यांच्या स्टेटसप्रमाणे वागायला पाहिजे असे त्यांना वाटते. ताण पडला सिगारेट आणि अतिच दु:ख झाले की दारूच्या स्वाधीन व्हायचे ही एक स्टाईल बनली आहे.
मुंबईत कोणत्याही आनंदोत्सवात मद्यसंस्कृतीचा अंमल वाढलेला दिसतो. विक्रमी दारूविक्रीचे तडाखेबंद आकडे प्रकाशित होऊन वाचण्यात आले की मनस्वी खेद होतो. मागील होळीच्या दोन दिवसांत मुंबईकरांनी साडेतीन लाख लिटर दारू रिचवली. नववर्षाचे स्वागत करताना हीच स्थिती राज्यातल्या बहुतेक शहरांत आणि देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश इथून येणा-या बातम्या हेच सांगत आहेत. तरुण पिढी आणि नशा हे समीकरण झाले आहे. सुखाच्या व दु:खाच्या वेळी नशा करून प्रसंग साजरा केला जातो.
नवे जन्म किंवा अकस्मात मरण, वाढदिवस किंवा लग्न, मिरवणूक किंवा निवडणूक, पास किंवा नापास, पिकनिक किंवा संमेलन, वर्षाचा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस असो नशा केलीच पाहिजे. दारू पिणे ही एक फॅशन झाली आहे. आपली संस्कृती सोडून पाश्चिमात्त्य संस्कृती स्वीकारलीच पाहिजे का? आपल्या सा-याच परंपरा कशा अमृतमय आहेत, त्या सोडून हे पाश्चिमात्त्य विष का बरं प्यायचे?
अनंत व्यसनात बुडालेली आजची तरुण पिढी म्हणजे एक गंभीर समस्याच होऊन बसली आहे. माणसाला विकृतीकडे ढकलणारी पाश्चिमात्त्य संस्कृती आपण सर्वानी अंगीकारली, त्याचेच भीषण परिणाम आज आपल्याला पदोपदी दिसताहेत. पाश्चिमात्त्य संगीत, पाश्चिमात्त्य नृत्ये आणि दारूचा महापूर आलेला दिसतो. काही ठिकाणी अमली पदार्थाचेही सेवन हमखास होते.
आजच्या तरुण पिढीला अशा नृत्यरजनींचे खूपच वेड लागले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रात्रभर दारू पिऊन तर्र झालेले हे युवक-युवती कित्येक अपघातांना बळी पडतात. त्यांच्याबरोबर इतरांचेही जीव हकनाक जातात. तरुण पिढी राजरोसपणे अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून येते. नराश्य, मनावरील दडपण, अतिताण, दु:ख यामुळे ते व्यसनांना बळी पडत आहेत. तरुणांमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. चांगल्या घरातील, सुशिक्षित आणि समंजस मुलेही ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली दिसत आहेत. यामागे एकच कारण आहे. काळ्या पैशाची किक. काळा पैसा घरात आला की, पैसेवाल्या बडे बाप के बेटय़ांना या व्यसनाच्या सवयी लागतात.
खरा ड्रग्जचा विळखा हा पब, डिस्कोथेक येथेच पाहावयास मिळतो. सर्वच वर्गात ही समस्या वाढत आहे. कुणी टेंशनच्या नावाखाली, कुणी पैशाच्या मस्तीच्या जोरावर या विळख्यात सापडत आहे. पण या नशेला खरी किक काळ्या पैशाचीच आहे. व्यसनांच्या कारणांची भली मोठी लिस्ट असली तरी कौटुंबिक संस्काराच्या अपूर्ततेमुळे अशा घडामोडी होत आहेत. व्यसन आरोग्याला व जीवनाला हानिकारक आहे हे तरुणाईने जाणून घेतले पाहिजे व व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर तरुण पिढीला व्यसनमुक्त करणे आवश्यक आहे. आपल्या देशाचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे. तसेच तरुण पिढीने सामाजिक भान ठेवून आपली संस्कृतीही जपली पाहिजे.
तरुणाईला समुपदेशनाची गरज आहे.