तालिबानी समर्थक नेते व लालकृष्ण अडवाणी यांची संघाच्या कार्यालयात भेट झाली होती असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
संघाच्या दिल्लीतील कार्यालयामधील बंद खोलीत रहेमानसोबत अडवाणी व संघाच्या नेत्यांची चर्चा झाली होती. त्यावेळी काय चर्चा झाली, हे अद्याप भाजप आणि संघाने उघड केले नाही. भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष राजनाथ सिंह हे हिंदू दहशतवाद्यांना भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. हे सर्व संशयास्पद असल्याचे दिसते. त्यामुळे दहशतवादावरून आंदोलन पुकारण्यापूर्वी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपण केलेल्या कार्याची उजळणी करावी, अशा शब्दांत मलिक यांनी भाजप व संघावर हल्ला चढवला.
दहशतवादाला धर्म, जात नसते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एखाद्या धर्माला उद्देशून केलेले वक्तव्य चुकीचे असले तरी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या संस्थेत अनेक दहशतवादी सापडले आहेत. शिंदे केंद्रीय गृहमंत्री असल्याने त्यांना याबद्दल माहिती असेल, त्यामुळे त्यांनी वक्तव्य केले असावे, असे सांगून नवाब मलिक यांनी शिंदेंची पाठराखण केली.
राज्य सरकारने तर ‘सनातन संस्था’ आणि ‘अभिनव भारत’ या संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. दहशतवादाचे राजकीय भांडवल करून भाजपने आंदोलन पुकारले आहे. भाजप धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दहशतवादाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
HI