शेतक-यांसंदर्भातील वक्तव्य तपासण्याचे आदेश
लातूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत कलम २०२ नुसार फौजदारी प्रक्रिया संहिताअन्वये तपास करून तीन जुलैच्या आत अहवाल सादर करावा, असे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी दिले आहेत.
रावसाहेब दानवे यांनी जालना येथे ‘एक लाख क्विंटल तूर खरेदी केली तरी रडतात..’ असे शेतक-यांना उद्देशून वक्तव्य केले होते. ही एक प्रकारची शिवी आहे. त्यांनी शेतक-यांना मानसिक दुखापत व अवहेलना करून जाणीवपूर्वक क्षती पोहचवली होती. रावसाहेब दानवे यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केल्याने शेतक-यांचा अपमान होऊन राज्यातील सामाजिक शांततेचा भंग झाला आहे. म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सतीश देशमुख यांनी भारतीय दंड संहितेचे कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीची दखल घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी घडलेल्या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याने कलम २०२ फौजदारी प्रक्रिया संहिताअन्वये तपास करून तीन जुलैपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.