Home महाराष्ट्र कोकण निष्पर्ण बेटावर जंगल फुलवणा-या वनपुरुषाची कहाणी

निष्पर्ण बेटावर जंगल फुलवणा-या वनपुरुषाची कहाणी

1

नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पद्मविभूषण पुरस्कार आकर्षणाच्या केंद्रस्थानी होता. या पद्म पुरस्कारांच्या यादीत एक अनोळखी नाव होते ते म्हणजे जादव ‘मुलाई’ पायेंग यांचे..

जादव पायेंग, वय वर्ष ५६, १९७९ सालापासून आयुष्य एकाच कामाला वाहून घेतलेले, झाडं लावायची आणि धरतीला हिरवे करायचे. हाच दिवसरात्र ध्यास. एक एक झाड स्वत:च्या हाताने लावत, आज ब्रह्मपुत्रेच्या एका बेटावर तब्बल १२५०(साडेबाराशे) एकरवर मुलाई कथोनी यांनी हे जंगलच उभे केले आहे.

मुलाई हे जादव यांचं टोपण नाव तर कथोनी म्हणजे जंगल,मुलाई कथोनी या त्यांच्या जंगलात बांबू, साग, काटेसावर, सुबाभुळ, कदंब, ऐन, अर्जुन, कपोक, शेवरी अशी ११० प्रकारची वेगवेगळी औषधी झाडं आहेत. जवळच्या काझीरंगा अभयारण्यातून गेंडे, तर शेजारच्या अरुणाचलमधून हत्ती ३ ते ४ महिने मुक्कामी येतात. अस्वल, हरणे, गवे आहेत, अगदी रॉयल बेंगाल टायगर म्हणजे पट्टेरी वाघही आहेत.

चिमण्यांपासून गिधाडांपर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी मुलाई कथोनीला आपलं घर मानले आहे.

वनपुरुष अशी ओळख

पाच वर्षापूर्वीपर्यंत हे नाव कोणालाही माहिती नव्हतं. आज जादव पायेंग यांना वनपुरु ष ही नवी ओळख मिळाली आहे. जादव पायेंग यांचं हे बेटावरचं जग बाहेरच्या जगाला कळायला तशी तब्बल ३० वर्ष लागली. पत्रकार आणि हौशी फोटोग्राफर असलेल्या जितू कलिता यांच्यामुळे या जंगलाची.. हे जंगल वसवणा-या जादव पायेंग यांची माहिती अगदी योगायोगाने समोर आली.

बांबूच्या घरात वास्तव्य
आसामची सांस्कृतिक राजधानी जोरहाटपासून २५ किलोमीटर अंतरावर कोकिलामुख परिसरात, टिपिकल बांबूच्या घरात जादव पायेंग राहतात. घराकडे जायचा रस्ताही अत्यंत खराब. संथ भासणारी, इथे दुभंगत पुढे पुन्हा जुळून येणारी ब्रह्मपुत्रा इथून हाकेच्या अंतरावर. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, आपण निसर्गाला काय देतो? या प्रश्नातून जादव पायेंग यांच्या थक्क करणा-या प्रवासाला सुरु वात झाली.

ब्रह्मपुत्रेचं रौद्र रूप जादव यांनी लहानपणी पाहिलं होतं, त्या महापुराने या बेटावर एक झाडंही शिल्लक ठेवले नव्हते. थोडीशीही सावली न मिळाल्यानं शेकडो साप वाळूत तडफडून मेले. झाडं नसतील तर आपली-माणसाची अवस्थाही अशीच होईल का या चिंतेने १६-१७ वर्षाचे जादव पायेंग अस्वस्थ झाले. गावातल्या वडीलधा-यांनी हसू लपवत त्यांना झाडं लावायचा सल्ला दिला, काहींनी बांबूची रोपंही दिली. तो सल्ला खूपच मनावर घेत जादव पायेंग यांनी बेटावर झाडं लावणं सुरू केलं ते काम आजतागायत सुरूच आहे.

दररोज नाव वल्हवत जायचं, झाडं लावायची
गेली ३५ वर्ष हा माणूस रोज अक्षरश: वेडय़ासारखे काम करतोय.. पहाटे ३.३० वाजता उठायचे. नाव वल्हवत नदी पार करायची, बेटावर जायचं, मिळतील तिथनं बी, रोपं गोळा करायची, वाळूच्या बेटावर खड्डे खणायचे आणि ती रोपं लावायची, वाढवायची.. ऊन,वारा,पाऊस काहीही असलं तरी जादव पायेंग आपली ही नाव काढतात आणि पलीकडच्या बेटावर जाऊन बी- रोपं लावण्याचं काम करतात.

उत्पन्नाचा स्रोत
नावेतून पैलतीरावर पोहोचायला अर्धा तास लागतो, नंतर अरुणा सापोरी बेट, ते ओलांडून बाहेर अर्धा तास म्हणजे साधारण ५-७ किलोमीटर चालल्यानंतर जादव यांचा गोठा लागतो.. वराहपालन आणि ५०-६० गायी, हाच जादव यांच्यासहित बेटावरील प्रत्येकाचाच उत्पन्नाचा मार्ग. गोठ्याच्या जवळच कुंपण घालून भाजीपाला लावलेला आहे, गायीच्या दुधापासून ते भात, भाजीपर्यंत सगळ्या गोष्टी १०० टक्के सेंद्रिय, विषमुक्त. त्यांच्या मुलाई कथोनी जंगलात असलेल्या प्रत्येक झाडांची वेगळी कहाणी आहे.

झाडं कापण्याआधी मला कापा
सुरुवातीच्या काळात त्यांच्या या जंगलात आलेल्या हत्तींनी गावात धुडगूस घातला, घरं उद्ध्वस्त केली. त्यामुळे नाराज गावकरी जादव पायेंग यांना मारायला, झाडं तोडायला सरसावले; पण झाडं कापण्याच्या आधी मला मारा असा पवित्रा जादव पायेंग यांनी घेतल्याने गावकरी शांत झाले. हत्तींना त्यांचं आवडतं खाद्य मिळावं आणि ते जंगलातच राहावेत असा जादव पायेंग यांचा साधा आणि सोपा विचार. जंगल उभारणीच्या या काळात जादव पायेंग यांनी एकही रोप वाया घालवलं नाही. दशकांपूर्वीच्या पुरात ओंडक्यासोबत एक छोटंसं रोपटं वाहत आलं, ते रोपटं अलगद काढून घेत जादव पायेंग यांनी इथे लावलं. आज त्याचे डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे.

लवकर येणारी झाडं लावली
लवकर लवकर येणारी झाडं लावायची, लवकर वाढवायची, हे एकच चक्र जादव यांच्या डोक्यात सतत सुरू असते. पुराच्या काळात पशुपक्षांना आधार ठरणा-या मोठ्या वारुळातल्या झाडाचा किस्साही भन्नाट आहे. वाळवीपासून हे झाड वाचवण्यासाठी त्यांनी गावातून मोठ्या लाल मुंग्या आणल्या होत्या.

जीवो जीवस्य जीवनम
जीवो जीवस्य जीवनम अशी एक परिपूर्ण इकोसिस्टिम म्हणजेच परिसंस्था मुलाई कथोनी इथे पाहायला मिळते. त्यात माणसाची लुडबूड जादव यांना खटकते. सुरुवातीच्या काळात शिका-यांनी मारलेल्या गेंडय़ाचे अवशेष आजही मुलाई कथोनीमध्ये आहेत. त्यामुळेच पृथ्वीला सर्वात मोठा धोका माणसांपासून आहे असं जादव पायेंग यांचं ठाम मत.

वाघ, हत्ती जिथे तळ ठोकायचे ती जागा ते आपल्याला दाखवतात आणि वाघासोबत झालेल्या भेटीचा किस्साही ऐकवतात. वाघाने आत्तापर्यंत त्यांच्या ६०-७० गायी-म्हशींचा फडशा पाडलाय; पण त्याची तक्रार जादव पायेंग करत नाहीत.

जंगल उभारण्याचं श्रेय स्वत:कडे नाही
या १२५० एकर जंगलाचं श्रेय ते एकटय़ाकडे घेत नाहीत, त्या कामात पक्षांचा, वा-याचा, निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा बरोबरीचा वाटा आहे असे ते मोठ्या मनाने मान्य करतात.

पृथ्वीला हवामान बदलापासून वाचवायचं असेल तर आपण झाडं लावायला हवीत, असं जादव पायेंग सांगतात. आहे ते टिकवण्याचं काम युवा पिढी करेल असा विश्वासही त्यांना वाटतो. त्यासाठी शाळेत पर्यावरण शिक्षण अनिवार्य करण्याचा सल्ला ते देतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने दोन झाडं लावली तरी पृथ्वी हिरवी बनेल असा त्यांना विश्वास वाटतो.

मेकाही बेटाचा शोध
मुलाई कथोनीच्या पुढे ब्रह्मपुत्रेचा आणखी एक प्रवाह पार करत जादव पायेंग यांनी आणखी एक मेकाही नावाचं बेट शोधून काढलंय. गेली ४ र्वष त्या दीड ते दोन हजार एकरवरच्या मेकाही बेटावर झाडं लावायचे त्यांचे आवडते काम सुरू आहे. येत्या काही वर्षात त्या वाळूच्या बेटावरही मुलाई कथोनीसारखं मोठं जंगल उभा करायचा चंग या झाडं लावणा-या माणसाने बांधलाय. जादव पायेंग यांचे काम पाहायला अनेक लोक बेटावर येतात, काही त्यापासून प्रेरणा घेऊन जातात. ३० वर्षानंतर का असेना केलेले काम लोकापर्यंत पोहोचतंय याचे समाधान जादव पायेंग यांना वाटते. जगभरात त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

फॉरेस्ट मॅन
फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया अशी आंतरराष्ट्रीय ओळखही त्यांना मिळाली आहे. राज्यातील देशातील अनेक पुरस्कार त्यांना मिळू लागले आहेत. पण कोणत्याही पुरस्कारापेक्षा झाडं लावण्याचं काम त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. मेरा घर बडा है साडेबारासो एकर का है, तुम्हारा घर कितना बडा है! असं ते विचारतात तेव्हा आपलीच कीव वाटते.

एकीकडे झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगलं उभी राहात आहेत, तर दुसरीकडे वाळूच्या बेटावर झाडं लावून खरंखुरं जंगल वसवण्याचं काम वनपुरुष जादव पायेंग करतायत.

फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करणा-यांच्या भाऊगर्दीत पक्ष्यांची, प्राण्यांची, पृथ्वीची चिंता करणारे जादव पायेंग वेगळे ठरतात. वनराजींनी नटलेल्या धरीत्रीचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न ते पाहत आहेत, त्यासाठी झटत आहेत, त्यामुळेच जादव पायेंग हेच आपले खरे हिरो आहेत. हेच आपले खरे महानायक आहेत.

आपल्या कोकणातील शेतक-यांना या वनपुरुषाची माहिती व्हावी म्हणून हा खटाटोप!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version