कोकणात येणा-या पर्यटकांना विनाखंडित वीजसेवा मिळावी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वीजवाहिन्या भूमिगत टाकण्याचा प्रस्ताव महावितरणने तयार केला आहे.
कोकणातील पर्यटनस्थळांना भेटी देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनस्थळे विकसित होत असताना येणा-या पर्यटकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणने सकारात्मक पाऊल उचलले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गतील पर्यटनस्थळे आणि कोस्टल एरियातील महावितरणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गतील पाच ठिकाणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील गणपतीपुळे, गुहागर, खेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि देवगड या ठिकाणी महावितरणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव महावितरणने तयार केला आहे. यामध्ये खेड शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी सर्वाधिक ४० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय अन्य ठिकाणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी २० ते ३० कोटींपर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोकण परिमंडळ विभागाने भूमिगत वीजवाहिन्यांसाठीचा प्रस्ताव तयार करून महावितरणच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी सादर केला. मुख्य कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या ऊर्जा खात्याकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मान्यतेनंतर पायाभूत योजनांसाठी निधी या योजनेअंतर्गत महाविरणचे पॉवर फायनान्स कार्पोरेशन या प्रस्तावासाठी आवश्यक निधीची तरतूद करेल. यानंतर हा प्रकल्प हाती घेतला जाईल.