विज्ञान क्षेत्रात ख-या अर्थाने देशातील तरुणच क्रांती घडवू शकतात. भारतीय तरुणांमध्ये जो आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मोठी झेप घेण्याची त्यांची क्षमता आहे.
या सामर्थ्य भारताचे भविष्य सामर्थ्यवान तरुणांच्या हाती आहे, असा विश्वास माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठात आयोजित १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेत ते बोलत होते.
भारतासमोर सध्या अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र, त्यांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी भारतातील तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत. उद्याचा भारत हा तुम्हीच घडवणार आहात. त्यामुळे जबाबदारीची जाणीव ठेवून यश मिळवा आणि भारताचे नाव जगात पहिल्या क्रमांकावर घेऊन जा, असे आवाहनही डॉ. कलाम यांनी यावेळी तरुणांना केले.
भारतीय विज्ञान परिषदेचा रविवारी दुसरा दिवस होता. डॉ. कलाम यांच्या हस्ते यावेळी बाल विज्ञान परिषदेतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गेल्या दोन वर्षात या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे डॉ. कलाम यांनी कौतुक केले. सर्व बालवैज्ञानिकांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालींसाठी डॉ. कलाम यांनी शुभेच्छा दिल्या.
तरुणांसाठी नेहमीच आकर्षण राहिलेल्या डॉ. कलाम यांचे विचार ऐकण्यासाठी भारतीय विज्ञान परिषदेच्या मुख्य मंडपात अनेकांनी गर्दी केली होती. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. संपूर्ण मंडपात आणि बाहेरही विद्यार्थ्यांची झालेली गर्दी पाहता डॉ. कलाम हे भारतीय विज्ञान परिषदेचे ‘फेस ऑफ दी डे’ ठरले, असेच म्हणावे लागेल.