मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाची राज्यघटना बदलण्याचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
संघ सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या गोष्टी करते. परंतु हा राष्ट्रवाद म्हणजे काय हे मात्र सांगत नाही. वैदिक धमार्तील मनुवादी शासन व्यवस्था त्यांना प्रस्थापित करायची आहे. त्यांना सध्याची लोकशाही शासनव्यवस्था व राज्यघटना मान्य नाही. २०१९ च्या निवडणुकात या सरकारला बहुमत मिळाले तर ते राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी आपण काहीही करु शकणार नाही असेही त्यांनी सांगितले. देशभक्त आणि देश्द्रोही अशी नवी फाळणी सध्या करण्यात आली. जे मोदीवर टीका करतील ते देशद्रोही असे आपले मुख्यमंत्रीच म्हणतात. सरकारचे काही चुकत असेल तर त्यावर टीका करण्याचा, बोलण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. सरकारच्या ज्या चुका दिसतात त्यावरच आम्ही टीका करतो. मोदीवर टीका करण्याचे कारण सध्या ते पंतप्रधान आहेत. आम्ही टीका करु नये असे वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, आम्ही टीका करणे बंद करु असाही टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
अराजक माजवत आहेत!
मोदी सरकार देशात अराजक माजविण्याचे काम करीत आहे. मोदी स्वत:ला व्यापारी समजतात. पण त्यांना हे माहित नाही की, व्यापा-यांचे नवीन वर्ष दिवाळीपासून सुरु होते. चोपड्या बदलल्या जातात. शेतक-यांचा नवा माल घरात येतो. बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते. शेतकरी माल विकून पैसा आणतात. नवे आर्थिक वर्षे मार्च पासून सुरु होते. त्यामुळे दिवाळी ते मार्चपर्यत बाजारात तेजी असते. अशा कालावधीत मोदींनी हजार, पाचशेच्या नव्या नोटा चलनातून बदलल्या. त्यामुळे बाजारपेठ ओस पडली. लोकांजवळ पैसा नाही. असंघटित कामगाराच्या हाताला काम नाही. त्यांनी मार्च नंतर नोटा बदलल्या असत्या तर अशी वेळ लोकांवर आली नसती. ऐन तेजीच्या काळात लोकांच्या हातातला पैसा काढून घेऊन सरकारने अराजकाची स्थिती निर्माण करण्याचे काम केले. देशातील लोक मयार्देपर्यंत डोक्यावर घेतात. एकदा डोक्यावर मिरे वाटायला सुरु केले की, मग दणकन खाली आदळतात हे मोदी आणि आरएसएसने ध्यानात घ्यावे असा इशाराही त्यांनी दिला.