मनोज जरांगे हेकेखोर, खोटं बोलतो, रोज पलटी मारतो

मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या अजय महाराज बारसकर यांचा जरांगेंवर तुफान हल्लाबोल

मुंबई : काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी आंदोलनात (maratha reservation) सहभागी असलेले अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर अनेक धक्कादायक आरोप करत तुफान हल्लाबोल केला. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत. जरांगे यांना बोलताना भान राहत नाही, असेही बारसकर यावेळी म्हणाले.


मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात, काही मराठ्यांची घरं याच जरांगे यांनी उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप बारसकर यांनी केला. अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली.


मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या. जरांगे यांच्या बैठका रात्री होतात. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोपही बारसकर यांनी केला आहे.


पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे चार वाजता झाली. तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशीला झाली.


अजय महाराज बारसकर म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवाली सराटीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो.


मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मीदेखील अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे. कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहेत, असे ते सांगत होते. होय, मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असे बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही. बरं, आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद होती, ती व्यक्त केली. मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून तो पाणी नाही प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला.


अध्यादेश, अधिनियम यामधील फरका मनोज जरांगे पाटील यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून खालच्या भाषेत त्यांना बोलताना मी स्वत: पाहिले आहे. त्यांनी मराठा समाजातील अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या आहेत. जरांगे यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करत आहेत. ते हेकेखोर आहेत, कोणत्याही शब्दावर अडून राहातो. सर्व प्रक्रियेत मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे मनोज जरांगे याला माहिती नाही, असा कडाडून हल्लाबोल अजय महाराज बरासकर यांनी केला.


जरांगेची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल. इतका अहंकार मुलांमध्येही आहे. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो की हा सरकार आणि भुजबळ यांचा माणूस आहे. माझा आणि कोणाचा संबंध नाही. मी मराठा आहे आणि समाजासाठीच काम करत असतो. आरक्षणाचे म्हणाल तर सांगतो की, जरांगे याने आजपर्यंत एकही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलेले नाही. रोज पलटी मारतो तो. सगळ्या मीटिंग कॅमेरासमोर करतो असे दाखवतो पण त्याच्या गुप्त बैठका होतात. याला घोडा लावतो, त्याला घोडा लावतो म्हणतो. ही याची भाषा.


२३ डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणतो. अर्धवट ज्ञान बेक्कार असते. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता.


१० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी समाजाची बैठक घेतली नाही? त्यावेळी लोकांनी विरोध केला. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. परंतु एक फोन आल्यानंतर जरांगे यांनी भूमिका बदलली. समाज अंतरवालीत गेला नाही. लोक आले नाहीत, त्यामुळे जरांगे संतापले होते. लोक जमा करता येत नाही, मी उपोषण कसे करु, असे जरांगे बोलल्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे.


डॉक्टर संतोष यादव यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदी जमा केल्या. त्याला जरांगे पाटील म्हणतात, तुम्ही सरकारच्या भाकरी करतात. त्यांना खूप काहीतरी बोलला आहे. हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. जरांगे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.


मनोज जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही, ते वारंवार भूमिका बदलतात, असा आरोप बारस्कर यांनी केला. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाही. मात्र त्यांनी एक निवेदन माझ्यासमोर कॅमेऱ्यासमोर लिहून दिले आहे. त्यांच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या त्यांनी माझ्यासमोर लिहून दिल्या आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील हे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात, असा आरोप त्यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, जरांगे हे पारदर्शक आहेत, कॅमेऱ्यासमोर बोलतात. अधिकारी, मंत्र्यांसोबत दरडावून बोलतात, म्हणून समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं, म्हणून समाजानं त्यांच्यावर प्रेम केलं. मात्र समाज फुटला असा संदेश जाऊ नये म्हणून मी आतापर्यंत गप्प होतो, असेही अजय महाराज बारस्कर म्हणाले.


बारस्कर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी २३ डिसेंबर रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे. तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरंच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करीन.


मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे पाटील यांनी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. दोन तास मिटिंग झाली. या अधिकाऱ्याने त्या बैठकीची रेकॉर्डिंग करून ठेवली आहे. ते निवृत्त होतील लवकरच. त्यानंतर जरांगे पाटील यांचं बिंग फुटणार आहे. जरांगे पाटील हे पारदर्शक नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो, असेही ते म्हणाले.


वाशीच्या मार्केटमध्ये जरांगे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही, अशी घोषणा केली. तसेच आरक्षण मिळालं तरी आपण आझाद मैदानात जायचं असेही जरांगे पाटील म्हणाले होते. तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना १५ मिनिटांत अध्यादेश देतो, असे सांगितले. खरंतर १५ मिनिटांत असा कुठलाही अध्यादेश निघत नाही. जरांगे पाटील यांना कायद्यातील काही कळत नाही, त्यांनी तिथेही समाजाची दिशाभूल केली. अनेकजण आझाद मैदानात पोहचले होते, यांनी मात्र इकडे आंदोलन संपल्याचे घोषित केले, कोणाशीही चर्चा त्यांनी केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा