काळजी घ्या! पुणे-मुंबईकरांना खोकला, सर्दी, तापाचा विळखा!

डेंगी, चिकनगुनिया देखिल फोफावतोय; प्लेटलेट्सच्या मागणीतही वाढ


मुंबई : गेल्या आठवड्यापासून पुणे-मुंबईतील वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यामुळे ऐन सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव पुणे-मुंबईकरांना येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी प्रचंड उकाडा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. पारा दोन-तीन अंशाने वर चढल्याने उकाड्यात वाढ होऊन नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारांनी नागरिक ओलेचिंब होत आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईत अधूनमधून होत असलेला पाऊस व उन यामुळे हिवताप, डेंग्यू व लेप्टोच्या रुग्णांबरोबरच चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने देखिल डोके वर काढले आहे.


खरेतर सप्टेंबर महिन्यात सर्वत्र पाऊस असतो. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुणे-मुंबईत विश्रांती घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला हलका ते मध्यम पाऊस झाला. पण त्यानंतर पाऊस गायबच झाला आहे. या महिन्यात नेहमी पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झालेला असतो. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने पुणे-मुंबईत कडक उन्हाळा जाणवत आहे.


नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने अनेक जणांना विविध आजार जडत आहेत. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.


सध्या एल निनो सक्रिय आहे. त्याचा हा परिणाम आहे. पॅसिफिक महासागराचे तापमान वाढले, तर वारे त्या महासागराकडे वळते. म्हणून आपल्या परिसरात पाऊस पडत नाही. पाऊस पडण्यासाठी वारे समुद्राकडून जमिनीकडे येणे अपेक्षित असते. सध्या उलट झालेले आहे.


भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, २६ सप्टेंबरपासून पुढील १०-१२ दिवस मध्य भारतामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील हा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


दरम्यान, पुणे-मुंबईसह दिल्ली, पाटणा आणि देशातील अनेक राज्यांमध्ये विषाणूजन्य ताप, डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाची प्रकरणे समोर येत आहेत. यावेळी डासांमुळे होणाऱ्या आजाराने गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


आरोग्य मंत्रालयही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व राज्यांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक रुग्णालयाला या रुग्णांसाठी अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे. असे असूनही लोकांना बेड मिळत नाही. जर तुमच्या आजूबाजूला कोणाला विषाणूजन्य तापाची ही लक्षणे दिसली तर त्याला नक्कीच रुग्णालयात दाखल करा कारण थोडासा निष्काळजीपणाही रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.



जास्त प्रमाणात पॅरासिटामॉल घेऊ नका


व्हायरल फिव्हरचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला असून, बहुतांश घरांमध्ये विषाणूजन्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत, मात्र रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घरी राहून तापासाठी पॅरासिटामॉल घेत असाल, तर लक्षात ठेवा की एका दिवसात ३ पेक्षा जास्त पॅरासिटामॉल घेऊ नका आणि २४ तासात ४ पेक्षा जास्त घेऊ नका. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पॅरासिटामॉलच्या एका दिवसात ३ पेक्षा जास्त डोस आणि २४ तासात ४ पेक्षा जास्त डोस तुमच्यासाठी धोकादायक असू शकतात. त्यामुळे ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे. परंतु डोसवर लक्ष ठेवा आणि पुढील डोस ६ तासांनंतरच घ्या. म्हणजेच, प्रत्येक डोसमध्ये ६ तासांचे अंतर ठेवा. कारण ओव्हरडोजचे स्वतःचे दुष्परिणाम होऊ शकतात.


डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या तापामध्ये अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो, म्हणून औषधासोबत पाणी प्यावे. लिक्वीड डाएट घ्या आणि शक्यतो आराम करण्याचा प्रयत्न करावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



चिकनगुनियाची लक्षणे


चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. हा ताप साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं असतात.


चिकनगुनिया ज्याला चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप देखील म्हणतात, हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग डेंग्यू तापासारखा दिसतो आणि तो तीव्र, कधी कधी सतत, सांधेदुखी (संधिवात) अशी लक्षणं आढळतात.


चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी.

Comments
Add Comment

Maharashtra Mahakhanij 2.0: खनिज चोरी रोखण्यासाठी महाराष्ट्रात 'डिजिटल' क्रांती; 'महाखनिज २.०' वेबसाईटचे लोकार्पण

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचे लोकार्पण

Amruta Fadnavis : गणरायाच्या दर्शनासाठी अमृता फडणवीस महापौर निवासस्थानी; तावडे कुटुंबीयांकडून स्वागत

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी १५

Food- Drug Administration Action: अन्न- औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, मुंबई- पुण्यातील अनेक अस्थापनांची परवाने निलंबित

मुंबई: ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासनाने मुंबई आणि पुण्यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर नवा विक्रम, ९० टन आयात माल घेऊन Boeing 777F दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश